कणकवली, ता. ०५ : कणकवलीमध्ये काल राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांवर चिखलफेक करण्यात आली. यात स्थानिक आमदारांनी राष्ट्रीय महामार्गाच्या उपअभियंत्यावर जनतेच्या तीव्र भावना व आक्रोशाची झलक मुजोर प्रशासन व्यवस्थेला दाखवली. परंतु विधिमंडळाच्या एका सदस्यावरच प्रशासन जुमानत नाही म्हणून अशा प्रकारे चिखलफेक आंदोलन करायची वेळ येते, ही जणू मागील साडेचार वर्षातील जिल्ह्यातील सुस्त प्रशासकीय यंत्रणेची कबुलीच दिलेली आहे अशी टीका मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केली आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे फेब्रु. २०१७ पासून काम चालू झाल्यानंतर या साखरसम्राट उपअभियंत्याने सामान्य जनतेची फसवणूक करून फक्त वेळ मारून नेण्याचेच काम केले यात दुमत नाही. याआधी पण महामार्ग कंत्राटदारांच्या मनमानी व बेशिस्त कारभाराविरोधात कुडाळ बचाव समितीचे रास्तारोको आंदोलन, घावनळे दशक्रोशी ग्रामस्थांचे आंदोलन, पणदूर- बांबर्डे पंचक्रोशी ग्रामस्थांचे आंदोलन अशी कित्येक आंदोलने सनदशीर मार्गानीच झाली. परंतु या आंदोलनांना प्रशासकीय यंत्रणेने दिलेला दुर्लक्षित प्रतिसाद पाहता जनतेने आपल्या अधिकारांसाठी नेमका कोणता पर्याय निवडावा हेही प्रश्नचिन्हच …! या कृतीचे समर्थन न करणे, एकवेळ मान्य करता येईल, परंतु जनतेने आपल्या मागण्या कशापद्धतीने मांडाव्यात जेणेकरून अशी आंदोलनाची वेळ येणार नाही तेही प्रशासनाने सांगावे. जनतेच्या निवेदनाना जर कायमच केराची टोपली दाखवली जात असेल तर असा आक्रोश अपेक्षितच आहे. महामार्गाचे काम चालू झाल्यापासून लोकांना ज्या मरणयातना भोगाव्या लागल्या त्याला संपूर्णतः निष्क्रिय पालकमंत्री व सत्ताधारी आमदार खासदार जबाबदार आहेत. कुडाळ मालवणचे सत्ताधिकारी पक्षाचे आमदार तर जनतेच्या प्रत्येक आदोंलनात सहभागी होऊन पाठिंबा देत सुटले होते, मात्र स्वत: सरकारमध्ये सहभागी आहेत हे सोयीस्कर पणे विसरायचे. गेली दोन वर्ष फक्त मनसेच राष्ट्रीय महामार्गाच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करत आहेत. भविष्यात मागील २ वर्षांचा राग, प्रक्षोभ जनतेने मतपेटीतून व्यक्त करावा म्हणजे आगामी काळात आंदोलनाची गरज भासणार नाही.
.