वेंगुर्ले रामघाट येथील घटना : ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
वेंगुर्ले : ता.८
शहरातील नवारवाडी-रामघाट येथे शनिवारी मध्यरात्री अचानक आलेल्या विजेच्या जादा व्होल्टेजमुळे येथील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात विद्युत उपकरणे जळून नुकसान झाले आहे. तर आज सदर भागात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर विद्युत प्रवाह सुरु केल्यानंतर पुन्हा अनेकांची इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक उपकरणे जळली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून धारेवर धरले. त्यामुळे पुन्हा एकदा अधिकाऱ्यांनी नवीन ट्रान्सफॉर्मर आणून जोडणीचे काम सुरू केले आहे.
विजेचा दाब अचानक वाढल्यामुळे रामघात येथील राजन दत्ताराम गावडे, अन्थोनी डिसोजा, रमेश पेडणेकर, सुचिता साळगावकर, अनिल मेथर, भानुदास वायंगणकर, पपू मांजरेकर, आना आजगावकर, अभिमन्यू परब, आनंद बांदेकर, सुनिल चव्हाण, अमेय नवार इत्यादी ग्रामस्थांचे फ्रिज, टीव्ही, वोशिंग मशिन, फॅन, मिक्सर आदी विद्युत उपकरणे जळून नुकसानी झाले. याबाबत ग्रामस्थांनी दुपारी अधिकाऱ्यांना घेराव घातला. विद्युत वितरणच्या सद्य स्थितीबाबत ग्रामस्थांनी त्यांच्या समोर समस्यांचा पाढाच वाचला. तसेच त्वरित विद्युत पुरवठा सुरु करावा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरित येथे बोलवावे अशी मागणी केली. नगरसेविका शितल आंगचेकर यांनी सुमारे २ तास होऊनही मुख्य अधिकारी उपस्थित न झाल्याने वीज वितरण उपअभियंता श्री. मुळे व श्री.कांबळे यांना धारेवर धरले. यावेळी आनंद बांदेकर, संजय गावडे, परबवाडा सरपंच पपू परब, हेमंत गावडे, श्री. मांजरेकर यानी स्थानिकांच्या विद्युत उपकरणांचे नुकसानी बाबत तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मारुती दोडनशेट्टी, बाबा डिसोजा, नामदेव सरमळकर, अभिमन्यू परब, विष्णू वायंगणकर, अंकुश आजगावकर, दादा पेडणेकर, हनुमंत तलवार, सुनिल चव्हाण, विजय गावडे आदींसह नागरिक बहुसन्नख्येने उपस्थित होते. दरम्यान तलाठी निलिमा सावंत यांनी नागरिकांच्या जळालेल्या उपकरणांची नोंद घेतली आहे.