अर्चना घारे : जिल्ह्याला आता कोण वालीच नाही, व्यक्त केली खंत
सावंतवाडी, ता. ०८ : कणकवली हायवे प्रश्न आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आंदोलनाची पद्धत चुक की बरोबर हा वेगळा प्रश्न आहे. मुळ प्रश्न हा आहे की त्यांना हे आंदोलन का करावे लागले. लोकांच्या भावना तिव्र होत्या आणि आहेत. माझ्या मते आ. नितेश राणे यांचा हेतू शुद्ध होता, असे सांगत राष्ट्रवादी पक्षाच्या पक्षनिरीक्षक अर्चना घारे-परब यांनी राणे यांच्या आंदोलनाचे ऐक प्रकारे समर्थन केले.
सौ. घारे परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, जिल्ह्यातून जाणाऱ्या हायवेच्या एकूणच परिस्थितीला पालकमंत्री दीपक केसरकर जबाबदार आहेत. अधिकाऱ्यावर त्यांचा वचक नाही. आधिकारी त्यांचे ऐकत नाहित असं त्यानी या पूर्वीही जाहीरपणे संगितले आहे. त्यामुळे जिल्ह्याला आता वालीच राहिला नसल्याने व त्यांच्याकडून लोकांनी अपेक्षा सोडल्याने अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आमदार नितेश राणे यांना चिखल फेकसारखे आंदोलन करावे लागले.
जिल्ह्याच्या रस्त्याच्या एकूणच परिस्थितीबाबत आपण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले असून लवकर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. दुसरीकडे तीव्र धरण दुर्घटनेत अनेकांचे हकनाक बळी गेलेत यामध्ये दोषी असणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची तत्परता गृहराज्यमंत्री दाखवत नाही. मात्र लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या आमदार राणे यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवतात. त्यामुळे पालकमंत्री केसरकर हे यातुन सूड बुद्धीचे राजकारण करत आहेत हेच सिद्ध होते. दरम्यान हायवेच्या परिस्थिती गणेश चतुर्थीपूर्वी न सुधारल्यास जिल्ह्यातील राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून सदशिल मार्गाने आंदोलन करेन असा इशाराही घारे परब यांनी दिला.