आरपीआय कार्याध्यक्ष वळंजू, खान यांनी घेतली पिंगुळकर कुटुंबियांची भेट…
मालवण, ता. ८ : आरपीआय पक्ष पिंगुळकर कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. सरकारी यंत्रणा, सामाजीक घटक व इतर संस्था या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई होण्याबरोबरच पिंगुळकर कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. शिवाय जिल्हाध्यक्ष रतन कदम हे याप्रकरणी मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांची लवकरच भेट घेणार असल्याची माहिती आरपीआयचे कार्याध्यक्ष वैभव वळंजू यांनी दिली.
आरपीआयचे कार्याध्यक्ष श्री. वळंजू, युवा आघाडीचे उपाध्यक्ष जुबेर खान यांनी पिंगुळी येथील पिंगुळकर कुटुंबीय तसेच कुडाळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री. कोरे यांची भेट घेतली. पिंगुळीत घडलेल्या घटनेला वीस दिवस पूर्ण होऊनही आरोपींना अटक न झाल्याने पोलिस ठाण्याच्या बाहेर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचीही दखल घेतली नसल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी पिंगुळकर कुटुंबीयांनी सरकारी यंत्रणा या प्रकरणात अपयशी ठरली असून पीडीतांची जबानी तसेच घटनेचा पुरावा म्हणून मुलीची जबानी घेतली. वैद्यकीय तपासणी घेऊनही अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. याउलट पीडीतांच्या कुटुंबीयांवर आरोप करून त्यांची कोणतीही चौकशी न करता त्यांची बदनामी करून काही सामाजीक संस्थांच्या पाठबळावर हा विषय दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. यावर आरपीआयच्या पदाधिकार्यांनी पिंगुळकर कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यत त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.