नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते शुभारंभ :लोकांना होणार फायदा
वेंगुर्ले ता.०९: येथील नागरिकांना आता “ई’ रिक्षातून सवारी करण्याची संधी मिळणार आहे.अस्टार्क ग्रुपच्यावतीने आज वेंगुर्ले नगरपालिकेला सहा आसनी रिक्षा देण्यात आली.नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते आज या “ई’ रिक्षेचा शुभारंभ करण्यात आला.याचा फायदा आता सर्वसामान्य लोकांना होणार आहे
वेंगुर्ले नगरपरिषदेस वेळोवेळी सी. एस. आर. निधीतुन वस्तू स्वरुपात अथवा रक्कम स्वरुपात निधी प्राप्त होत असतो. वेंगुर्ले नगरपरिषदेकडुन अस्टार्क ग्रृप ऑफ इंडस्ट्रिज यांच्याकडून ई-रिक्षा मिळावी म्हणून प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार अस्टार्क ग्रृप ऑफ इंडस्ट्रिजकडून सहा आसनी ऑटो पॅसेजर रिक्षा आणि मालवाहक रिक्षा वेंगुर्ले नगरपरिषदेस प्राप्त झाल्या आहेत. सदरच्या रिक्षा या इलेक्ट्रॉनिक रिक्षा असल्याने यासाठी इंधनाचा खर्च शुन्य असणार आहे. या रिक्षा बॅटरीवर चालणाऱ्या असल्याने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील बायोगॅस मधुन विजनिर्मिती होत असलेल्या विजेवर त्या चार्ज करण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या विजेच्या खर्चाचा बोजा नगरपरिषदेवर पडणार नाहि. यातील सहा आसनी ऑटो पॅसेंजर रिक्षा शहरात फिरणार असुन त्यासाठी नागरिकांकडून कमीत कमी भाडे आकारले जाणार आहे. तर मालवाहक रिक्षातून नगरपरिषदेच्या सामानाची वाहातूक करण्यात येणार आहे.
या दोन्ही वाहानांचा शुभारंभ नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, नागेश गावडे, धर्मराज कांबळी, शैलेश गावडे, दादा सोकटे, नगरसेविका श्रेया मयेकर, कृपा गिरप, शितल आंगचेकर, पुनम जाधव, स्नेहल खोबरेकर, साक्षी पेडणेकर, यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.