विद्यार्थ्यांनी घेतले शेती शिक्षणाचे धडे…
वैभववाडी/पंकज मोरे ता.१०:सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ‘बांधावरची शाळा’ या उपक्रमांतर्गत मंगळवारी जि. प. प्राथमिक शाळा विद्या मंदिर ऐनारी तसेच तालुका कृषी वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांनी एक दिवस बांधावर घालून भात लावणी प्रत्यक्षरित्या शेतीचा अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांना लहान वयातच शेतकऱ्यांच्या कष्टाबद्दल जाणीव व्हावी, शेती बद्दल आस्था निर्माण व्हावी. या उद्देशाने सिंधुदुर्ग जि. प. च्या वतीने गेल्या वर्षी पासून हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला असून त्याला शाळा व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
यावेळी कृषी सहाय्यक चंद्रकांत इंगळे यांनी श्री पद्धत सुधारित भात लागवड पद्धत विषयी मार्गदर्शन केले. या उपक्रमात मुख्याद्यापक श्री. चव्हाण यांच्यासह सर्व शिक्षक, ऐनारी गावचे प्रगतशील शेतकरी महेश पवार, महालक्ष्मी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. ज्योती गुरव आदी या उपक्रमात सहभागी झाले होते.