दोडामार्ग ता,२४: गेल्या अनेक दिवसापासुन दशक्रोशीतील बीएसएनएल सेवेच्या उडालेल्या बोजवाऱ्यामुळे रास्त धान्य दुकानातुन पुरवठा बंद केला गेला आहे.
शासनाने ऑनलाईन पद्धतीने रास्त धान्य दुकानातुन धान्य वितरीत करण्याचे आदेश दिल्यानंतर पुरवठा दुकानदारांनी याचा प्रखर विरोध केला होता त्याला कारणही तसेच होते. ग्रामिण भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने धान्य ऑनलाईन चलनाच्या आधारे वितरित करताना अनेक समस्यांना या दुकानदारांना सामोरे जावे लागणार होते. याच मुळे त्यांनी विरोध केला होता मात्र शासनाने नियम लागु करताच नियमानुसार धान्य वितरित करणे या दुकानदारांना भाग पडले.
उन्हाळ्यात व हिवाळ्यात नेटवर्कची फारशी समस्या नसली तरी पावसाळ्यात मात्र या नेटवर्कमुळे सर्वसामान्य नागरिकांचे यामुळे बरेच हाल झाले. गेल्या अनेक दिवसांपासुन साटेली भेडशी दशक्रोशीत बीएसएनएलची सुविधा अधुन मधुन बंद पडत असल्याने धान्य वितरित करताना समस्या येत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासुन कोनाळकट्टा येथिल टॉवर बंदच आहेत तर भेडशी येथे अधुन मधुन रेंज गायबच असते सोनावल, मेढे त्याच बरोबर अन्य गावात देखिल हिच परिस्थिती आहे. पावती बुकने धान्य वितरित करा. आधी ज्या प्रकारे पावती बुकाने धान्य वितरित केले जायचे त्याचप्रकारे धान्य वितरित करा अशी मागणी नागरिक करु लागले आहेत तर दोडामार्ग पुरवठा शाखेचे म्हणणे आहे की तसे आदेश आम्ही देवु शकत नाही. असे म्हणत हात वर केले.
साटेली भेडशी सारख्या बाजारपेठेत रास्त भावाची दोन दुकाने असुन यामार्फत जवळपास सात ते आठ गावातील ग्राहकांना धान्याचा पुरवठा केला जातो परमे, घोटगे, बोडदे यासारख्या लांब गावामधुन सकाळीच लोक धान्य मिळवण्यासाठी येतात मात्र नेटवर्क अभावी रिकाम्या हातांनी त्यांना परतावे लागते दरदिवशी दोनशे ते तीनशे रेशनकार्डाचा गठ्ठा या धान्य दुकानाबाहेर लागलेला दिसुन येतो. आज रोजी अर्ध्यापेक्षा अधिक लोकांना धान्यपुरवठा केला गेला नाही. नेटवर्क सुविधा पाहता अजुन चार पाच दिवसात तरी नेटवर्क मिळेल याची काही शाश्वती नाही. आता महिना संपत आला तरी घरात धान्य नाही त्यामुळे खायच काय असा प्रश्न सर्वसामन्य नागरिकांना पडला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या समस्यांची लवकरात लवकर दखल घ्यावी व पुर्वी प्रमाणे पावती बुकाने धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे