आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी
वैभववाडी/पंकज मोरे ता.२३:राज्यात उशिरा का होईना दाखल झालेल्या पावसाने सगळीकडे हाहाकार उडविला. वैभववाडी तालुक्यात गेले आठ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्रात पर्जन्यमान चांगले झाले.
वैभववाडीसह जिल्ह्यात यावर्षी चांगलाच पाऊस झाला. काही शेतकऱ्यांची भात लावणी अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने दांडी मारली. दररोज ढगाळ वातावरण असल्याने पावसाच्या सरी आज कोसळतील या आशेने शेतकरी दिवस काढत होते. अखेर वरूणराजाने जोरदार बरसात केली. त्यामुळे अंतिम टप्यात असलेली भात लावणी उरकण्यात शेतकरी मग्न असल्याचे दिसत आहे.