संतप्त ग्रामस्थांनी विचारला वेंगुर्ला तालुका विभागीय अभियंत्यांना जाब
वेंगुर्ले, ता.२९ : तालुक्यातील वेतोरा वरचीवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये असलेला बीएसएनएल टॉवर गेले तीन ते चार दिवस बंद आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी बीएसएनएलचे वेंगुर्ला तालुका विभागीय अभियंता श्री कुंभार यांना जाब विचारला. तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करून नेटवर्क सुरळीत करण्याची मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली.
वेतोरे वरचीवाडी येथील बीएसएनएल टॉवर गेले तीन चार दिवस बंद असून नेटवर्क नसल्यामुळे ग्रामस्थांची मोठ्याप्रमाणात गौरसोय होत आहे. या टॉवर साठी असलेला ट्रान्सफॉर्मर बंद असल्यामुळे विद्युत लाईन बंद आहे. तरी लवकरात लवकर ट्रान्सफार्मर बदलून विद्युत लाईन सुरळीत करावी. तसेच पॉवर प्लान्ट तात्काळ बदलण्यात यावा अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या. तसेच याबाबत विभागीय अभियंता कुंभार यांना जाब विचारला. यावेळी पुढील दोन दिवसात बीएसएनएल सेवा सुरळित न झाल्यास पुढील होणाऱ्या नागरिकांच्या उद्रेकास बीएसएनएल प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला. यावेळी उपसरपंच नाना वालावलकर, ग्रा. प. सदस्य सुधीर गावडे, ग्रामस्थ मदन राऊळ, बाळा वालावलकर, अनिल गावडे, योगेश नाईक, नागेश परब, विघ्नेश गावडे, श्याम गोगटे, सोमा राऊळ, राहुल परब, राजन वेतोरकर, जे. के. सावंत आदी उपस्थित होते.