राजन तेली ; मोती तलावाच्या सुशोभिकरणासाठी पन्नास कोटी मागितले…
सावंतवाडी,ता.१४: कोणाला तिकीट द्यावे, निवडून आणावे हा निर्णय भाजपात वरिष्ठांकडून घेतला जातो. त्यामुळे दिपक केसकरांना निवडून आणण्याबाबत आमदार नितेश राणेंनी व्यक्त केलेले मत त्याचे वैयक्तिक आहे. त्याबाबत “नो कॉमेंट्स” अशी भूमिका आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी मांडली. दरम्यान सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे. त्यासाठी मोती तलावाच्या सुशोभिकरणासाठी व “त्या” ठिकाणी कारंजे लावण्यासाठी पन्नास कोटीची मागणी आमच्या नेत्यांकडे करणार आहे. त्याच बरोबर सावंतवाडीकरांशी चर्चा करुन शहराचा विकास कसा करावा, याबाबतची मते घेतली जातील. लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
श्री. तेली यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी वकील संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. परिमल नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री.तेली यांना नितेश राणेंनी केलेल्या विधानाबददल विचारले असता ते म्हणाले ते त्यांचे वैयक्तीक मत आहे. त्यामुळे यावर आपण काही बोलणार नाही. या ठिकाणी पक्षात जर-तर च्या मताला किंमत नसते. कोणी काय करावे याचा निर्णय पक्ष श्रेष्ठी घेत असतात. त्यामुळे मी आत्ता विषयावर बोलणे संयुक्तिक वाटणार नाही. राणेंनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तीक मत आहे. ते आपले मत मांडू शकतात.
ते पुढे म्हणाले, येणार्या काळात सावंतवाडीचा सर्वांगीण विकास करायचा आहे. त्या उद्देशाने सावंतवाडीकरांची लवकरच बैठक घेवून याबाबत पुढील भूमिका ठरविली जाईल. या ठिकाणी आम्हाला विकास करायचा आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आमची पुढची वाटचाल सुरू असून पुन्हा एकदा सावंतवाडीला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.