राजन तेली; तुमच्यासोबत किती शिवसैनिक आले याचा मुख्यमंत्र्यांनी “एक्झिट पोल” घ्यावा…
सावंतवाडी,ता.१४: राजकारणात कोणीही “ताम्रपट” घेऊन येत नाही, त्यामुळे दीपक केसरकर तुम्हीच भाजपात या, मीच तुमची विधानपरिषदेसाठी “शिफारस” करतो, अशी खुली ऑफर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथे दिली. दरम्यान केसरकरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मतदारसंघातील किती शिवसैनिक सोबत राहिले याची माहिती मुख्यमंत्र्यांनी एकदा घ्यावी, तसा “एक्झिट पोल” घेण्याची मागणीही मी करणार आहे. मग तेच ठरवतील यांना पुन्हा उमेदवारी द्यायची की नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. श्री.केसरकर यांनी सावंतवाडीतील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत श्री.तेली बोलत होते.
यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, विनोद सावंत, भाऊ कोळमेकर, संतोष पालेकर, प्रमोद गावडे, संदीप राऊळ, बाळू शिरसाट आदिंसह मोठ्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, या ठीकाणी मला विधान परिषदे घ्यावे असे सांगुन केसरकर यांनी आपले राजकीय अज्ञात प्रकट केले आहे. मी गेली अनेक वर्षे भाजपात प्रामाणिकपणे काम करीत आहे. मागच्या विधानसभा निवडणूकीत हातात एबी फॉर्म असताना सुध्दा केवळ पक्षाकडुन आदेश न मिळाल्याने मी निवडणूक अपक्ष म्हणून लढविली होती. उलट केसरकर यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी नेहमी गद्दारी केली. पहील्यांदा नारायण राणे त्यानंतर शरद पवार आणि आता उध्दव ठाकरेंना शिव्या घालून ते आपले राजकीय पोळी भाजून घेत आहेत. मी निवडणूक लढविली तसेच हरलो परंतू कोणाला शिव्या घातल्या नाहीत. कोणाला उलट बोललो नाही. ही माझी संस्कृती आहे. त्याच बरोबर माझा पराभव झाला असला तरी गेली पंचविस वर्षे मी सावंतवाडीकरांच्या सुखदुखात आज ही त्यात तिडकीने काम करीत आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणाच्या गोष्टी त्यांनी आम्लाला सांगू नयेत.
मला विधान परिषद द्यावी, असे वक्तव्य श्री. केसरकर यांनी केले. याबाबत श्री. तेली म्हणाले, मला काय द्यावे याचा निर्णय भाजपाचे वरिष्ट नेते घेणार आहेत. तुम्ही शिंदे गटात गेलात मग भाजपाचे गोडवे का गात आहात ? तुम्हाला भाजपात यायचे आहे तर खुशाल या, असे त्यांनी केसरकर यांना आमंत्रण दिले. तर कोणी ताम्रपट घेवून आलेले नाही. त्यामुळे सिटींग मेंबरलाच तिकीट मिळत असे कोणाला वाटत असेल, तर गोव्यात विद्यमान उपमुख्यमंत्र्याला डावलण्यात आले तर गुजरातच्या निवडणूकीत पन्नास टक्केहून अधिकांना तिकीटे नाकारण्यात आली. त्यामुळे तुम्ही भ्रमात राहू नका आणि तुम्हाला लढायचेच आहे. तर तुमच्या पक्षातून खुशाल लढा, कोण सरस आहे हे त्यावेळी ठरेल, पण एकदा काय ते होऊन जाऊ देच असा टोलाही त्यांनी लगावला.
मी विधानसभा लढवावी की नाही, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. मात्र माझ्या सोबत गेली अनेक वर्षे काम करणार्या कार्यकर्त्याना न्याय मिळावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. आणि यापुढे ही असणार आहेत, असे तेली म्हणाले.