रणजीत देसाई; सभा घाई-गडबडीत आटोपण्यासाठीच सुट्टी दिवशी…
सिंधुदुर्गनगरी ता.०२: सहा महिन्यांच्या कालावधीनंतर होत असलेली जिल्हा नियोजन सभा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी 10 ऑगस्ट रोजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लावली आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार व सोमवारी बकरी ईदची सुट्टी आहे. त्यामुळे सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्याने जिल्ह्यात बहुसंख्येने असलेले अन्य जिल्ह्यातील अधिकारी आपल्या गावी जाणार आहेत. नेमकी हीच संधी साधत केसरकर यांनी ही सभा लावली आहे. त्यांना घाई-गडबडित ही सभा आटपायची आहे. त्यामुळेच त्यांनी हा प्रयत्न केला असून किमान यापुढिल सभा सुट्टीच्या दिवशी घेवू नये यासाठी पालकमंत्री केसरकर व जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांना कॅलेंडर भेट देणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आपल्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देसाई यांनी, जिल्हा नियोजन अधिकारी यांना कॅलेंडर भेट दिल्याचे सांगत मी नियोजन समिती सदस्य असताना अद्याप मला रितसर सभा नोटिस आलेली नाही. व्हाट्स अपवर सभा असल्याचे पत्र व दूरध्वनीवर निमंत्रण देण्यात आलेले आहे. अद्याप सभा अजेंठा मिळालेला नाही. याबाबत आम्ही पालकमंत्री केसरकर यांचा निषेध करतो. तसेच जानेवारी मध्ये मंजूर झालेल्या कामांची यादी मार्च 2019 अखेर जिल्हा परिषदेला देण्यात आली. त्याचवेळी लोकसभेची निवडणूक आचार संहिता लागली. त्यामुळे या कामांची मंजूरी जून महिन्यात झाल्या. हे धक्कादायक आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले. त्यामुळे 10 ऑगस्ट रोजीच्या सभेलाच सर्व कामाना मंजूरी मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे यावेळी देसाई म्हणाले.
पालकमंत्री केसरकर यांनी, ‘मी भरपूर निधी आणला. मात्र, खर्च करण्याची मानसिकता अधिकाऱ्यांची नाही’ असे सांगितले होते. पण प्रत्यक्षात केसरकर यांचीच जिल्ह्याचा विकास करण्याची मानसिकता नाही. 70 वेळा बैठका घेवुनही अंतिम निर्णय ते घेत नसल्याने जिल्ह्यातील अधिकारी तणावाखाली आहेत. चांदा ते बांदा योजनेतून पशुसंवर्धन योजना अद्याप सुरु झालेली नाही. मात्र, आपल्या वाढदिवसाला सावंतवाडी येथे कुक्कुट पिल्ले त्यांनी वाटत ही शासकीय योजना असल्याचे भासविले. प्रत्येक्षात हा कार्यक्रम शिवसेनेचा होता, असा आरोप यावेळी देसाई यांनी केला.