दुष्मी रेल्वे गेट परिसरात भुस्खलन
पेण, ता.4 : मुसळधार पावासाचा फटका कोकण रेल्वे बसला आहे. पेण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे या मार्गावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. दुष्मी रेल्वे गेट परीसरात भुस्खलन झाल्याने रेल्वे मार्गावर मातीचा ढिगारा आला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आहे. सकाळी साडे सहा वाजल्यापासून राजधानी एक्सप्रेस या परीसरात अडकली आहे.
याचसोबत रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाचं धुमशान सुरुच आहे. २४ तासात सरासरी १५३ मिलीमिटर इतका पाऊस झाला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असली, तरीही अद्याप धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाताळगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढत असून मौजे आपटे गावांमधील जुना कोळीवाडा, मुस्लिम मोहल्ला, जुनी पिंपळ आळी येथील नदीकाठच्या घरांमध्ये पाणी आले असून तेथील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आपटा-खारपाडा रोडवर पाणी साचले असून वाहतूक बंद झाली आहे.