तहसीलदारांच्या पोलिसांना सूचना: मुसळधार पावसामुळे निर्णय…
सावंतवाडी ता.०५: तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे आंबोली मार्गे पुढे कोल्हापूर व बेळगाव येथे होणारी अवजड वाहतूक थांबवण्यात यावी व छोटी वाहने मार्गस्थ केली जावीत आशा सूचना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पोलिसांना केल्या आहेत.
सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.सगळीकडे पाणी आल्यामुळे ग्रामीण भागाचा सम्पर्क तुटला आहे.कित्येक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे प्रमाण वाढत आहे.नदी नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत असून रस्त्यावर ही ठिकठिकाणी पाणी साचले आहे.आंबोली,चौकुळ भागात नदी नाल्याना पूर आल्यामुळे काही गावांचा सम्पर्क तुटला आहे.तर तळवडे,कारीवडे,कोलगाव काजरकोंड पुलांवर पाणी आल्याने शहराच्या दिशेने होणारी वाहतूक ठप्प झाली.त्यामुळे सावंतवाडी आंबोली मार्गे कोल्हापूर, कर्नाटक या दिशेने होणारी अवजड वाहतूक रोखण्यात यावी अशीं सूचना तहसीलदार श्री.म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात सम्पर्क साधुन दिली आहे.अवजड वाहने आंबोली येथेच थांबवण्यात यावीत.व छोटी वाहने दुचाकी यांना मार्गस्थ करण्यात यावे असेही आदेश पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत.



