नारायण राणे:चर्चा नको, कामाला लागा. कार्यकर्त्यांना आदेश
कणकवली, ता. 11 ः सिंधुदुर्गातील तीनही मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष निवडणूक लढणार आहे. या ठिकाणी कोण उमेदवार असतील ते मी ठरवणार आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आदेश खासदार नारायण राणे यांनी आज दिले. ओसरगाव येथे स्वाभिमान पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. यात श्री.राणे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. या बैठकीला आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्गातील तीनही मतदारसंघ आपल्याला जिंकायचे आहेत. त्यादृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे. सोशल मिडियावरील चर्चेत वेळ घालवू नका. कुठल्या मतदारसंघात कोण उमेदवार असेल ते योग्य वेळ आली की मी जाहीर करणार आहे. आता राज्यासह सिंधुदुर्गात पूरस्थिती आहे. या पूरग्रस्तांना मदत मिळणे आणि त्यांचे संसार पुन्हा उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी पक्षाकडून जेवढे सहकार्य होईल तेवढे करा.
स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी आपण निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितले. मात्र राणेसाहेब जी जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याची ग्वाही दिली. तर सतीश सावंत यांनी आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही. तर राणेंचा कार्यकर्ताच म्हणून काम करणार असल्याची ग्वाही दिली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विनाकारण माझ्या नावाची चर्चा होत असल्याचीही खंत त्यांनी यावेळी मांडली.