माजी आमदार उपरकरांचा पालकमंत्री केसरकरांना मैत्रीत्वाचा सल्ला
सावंतवाडी ता.१२: दीपक केसरकर हे मतदारसंघाचे नव्हे तर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.त्यामुळे त्यांनी अन्नधान्य व रोख रक्कम वाटप करताना मतदारसंघाचा नव्हे जिल्ह्याचा विचार करावा.हा आपला त्याना मित्रत्वाचा सल्ला आहे,असा टोला मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.
आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका मशीन बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मनसेची आग्रही मागणी आहे.त्यामुळे त्या मागणीबाबत जनजागृती होण्यासाठी मनसेकडून मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.असेही त्यांनी सांगितले.
श्री उपरकर आज सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात पूरपरिस्थिती मुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज या ठिकाणी आले होते. यावेळी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पूरग्रस्तांची फसवणूक केली आहे.फक्त दोन कोटी रुपये जाहीर करून तोंडाला पाने पुसण्याचा हा प्रकार आहे.तर दुसरीकडे फक्त मतदारसंघातील लोकांना रोख रक्कम व आश्वासने देऊन केसरकर जिल्ह्यातील अन्य लोकांची फसवणूक करत आहेत.पालकमंत्री हे जिल्ह्याचे असतात त्यामुळे त्यांनी मतदारसंघ वगळता अन्य ठिकाणी झालेल्या नुकसानीचा आकडेवारी लक्षात घेता,तेथील नुकसानग्रस्तांना सुद्धा मदत करावी.यापूर्वी त्यांनी आपण केरळ येथील पूरग्रस्तांसाठी दुष्काळग्रस्तांसाठी सहकार्य केले असे जाहीर केले.परंतु आता त्यांनी आपल्या मतदार संघासह जिल्ह्यातील लोकांना मदतीचा हात पुढे करावा हा आपला त्यांना मैत्रीचा सल्ला आहे.असेही श्री.उपरकर यांनी सांगितले.
यावेळी धीरज परब,राजू कासकर, दत्ताराम गावकर ,संतोष सावंत, कुणाल किनळेकर ,आशिष सुभेदार,ललिता नाईक, बाळा पावसकर आदी उपस्थित होते.