आ. नितेश राणे; वैभववाडी तालुका शांतता कमिटी बैठक संपन्न
वैभववाडी.ता,१९: मागील दोन आठवड्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सगळीकडे साथीचे रोग पसरू शकतात. तसेच गणेश चतुर्थी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. तत्पूर्वी शहरात औषध फवारणी करून आरोग्याबाबत जनजागृती करा. आरोग्याबाबत हलगर्जीपणा नको. अशा सूचना आ. नितेश राणे यांनी आरोग्य विभागाला केल्या.
वैभववाडी तालुका शांतता कमिटीची बैठक तहसिल कार्यालयात आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, उपसभापती हर्षदा हरयाण, स्वाभिमान अध्यक्ष अरविंद रावराणे, स्वाभिमान महिला तालुकाध्यक्षा प्राची तावडे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष गिरीधर रावराणे, तहसिलदार रामदास झळके, सा. बां. चे उपविभागीय अभियंता श्री. तावडे, न. पं. मुख्याधिकारी, स्वाभिमान जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, विकास काटे, वीज वितरणचे श्री. शिंदे, दादामिया पाटणकर आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. राणे म्हणाले, गतवर्षी प्रमाणेच याही वर्षी नियोजन झाले पाहिजे. मुंबई, कोल्हापूर अन्य भागातून चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पावसाने साथीचे रोग उद्भवू शकतात. साथ येण्यासाठी तुम्ही थांबू नका तर साथ येण्यापूर्वीच आरोग्य विभागाने सतर्क राहावे. अशा सूचना आरोग्य विभागाला केल्या. तसेच तालुक्यात वीजेच्या तक्रारी वाढत आहेत. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करा. अशा सूचना वीज वितरणला केल्या.
मुंबई चाकरमानी मोठ्या संख्येने रेल्वेने येणार आहेत. चाकरमान्यांना एस. टी. उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी एस. टी. महामंडळाने रेल्वेच्या वेळेत एस. टी. बसेस रेल्वे स्थानकात सज्ज ठेवाव्यात. अशा सूचना तहसिलदार रामदास झळके यांनी वाहतूक नियंत्रकांना केल्या. न. पं. ने गणेश चतुर्थी कालावधीत नो पार्किंग झोन सक्तीचे करावे. यासाठी वाहतूक पोलिस पूर्ण सहकार्य करतील.
गणेश चतुर्थी दरम्यान बाजारपेठेत वाहतूकीचा प्रश्न निर्माण होवू नये. वाहने पार्किंग करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रकारची कोंडी होता कामा नये. यासाठी पोलिस प्रशासनाने काळजी घ्यावी. तसेच व्यापारी रस्त्यावर बसतात. त्याठिकाणी दोरी लावून योग्य ती मर्यादा ठरवून द्यावी. अशी सूचना तहसिलदार झळके यांनी न. पं. ला केली.