होऊ द्या चर्चा कार्यक्रम ; वातावरण तणावपूर्ण, पोलीस यंत्रणा सतर्क…
मालवण,ता.०४: भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आयोजित “होऊ द्या चर्चा” या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील पोईप गावात भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
राज्यात अराजकता वाढली आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना दिलेली खोटी आश्वासने, चुकीचे शैक्षणिक धोरण यांमुळे जनतेच्या मनात खदखद निर्माण झाली आहे. यासह अन्य विषयांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी हिंदुत्वा सारखे मुद्दे समोर आणले जात आहेत. त्यामुळे जनतेमध्ये जागृती करण्यासाठी आणि जनतेच्या मनातील असंतोषाला बाहेर काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी पोईप बाजारपेठ येथे ‘होऊ दे चर्चा’ हा जनतेशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने दाखल झाले त्यांनी आम्हाला पण या चर्चेत सहभागी व्हायचे आहे, अशी भूमिका घेतली. याठिकाणी दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी सुरु झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.