बबन साळगावकर; प्रतिष्ठान कडून विविध शासकीय दाखल्यांचे वाटप…
सावंतवाडी ता.२२: डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य हे महात्मा गांधींच्या बरोबरीचे आहे.गांधीजींनी जसा सत्य,अहिंसा आणि शांततेचा संदेश दिला.तोच संदेश डॉ.धर्माधिकारी यांनी दिला आहे.त्यामुळे त्यांना आधुनिक काळातील गांधीजी म्हटलं तर वावगं ठरणार नाही.असे प्रतिपादन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात बोलताना केले.येथील नाथ पै सभागृहात धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने विविध शासकीय दाखले वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी,मुख्याधिकारी संतोष जिरगे,तहसीलदार राजाराम म्हात्रे,उपवनसंरक्षक समाधान चव्हाण,लता वाडकर,उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर,पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते.
श्री साळगावकर पुढे म्हणाले मीसुद्धा या प्रतिष्ठानचा सदस्य आहे.त्यामुळे या प्रतिष्ठान च्या कार्याची मला जाणीव आहे.आधुनिक काळात अशा सत्संगाचा मार्ग दाखविणाऱ्या सर्व संस्थांनी समाज प्रबोधनासाठी पुढे येणे गरजेचे आहे.त्यासाठी महाराष्ट्रातील अशा सर्व संस्थानी एकत्र येऊन आपली एक मजबूत संघटना तयार केली.तर त्यांना आपले समाजोपयोगी कार्य पुढे सुरू ठेवणे अधिक सोपे होईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील दोन हजारहून अधिक उपस्थित लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले.तसेच प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभरात घेण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.यात वृक्षारोपण,आरोग्य शिबीर,स्वच्छता मोहीम तसेच इतर सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली.