तहसीलदारांचे आश्वासन:दरडी हटविण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू
ओटवणे
दरड पडलेला असनिये- घारपी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू झाले आहे.गुरुवारी दरडींचा उर्वरित भाग हटविण्यास सुरवात करण्यात आली.दरम्यान, सावंतवाडी तहसीलदार राजराम म्हात्रे यांनी घारपी ग्रामस्थांची भेट घेत त्यांना पूरग्रस्तांचे निकष लावून तात्काळ मिळणाऱ्या भरपाईसाठी प्रयत्न करू,असे आश्वासन दिले.
अतिवृष्टीदरम्यान असनिये-घारपी मार्गावर दरड कोसळून हा रस्ता बंद झाला होता.या दरडींच्या शेजारी असणाऱ्या कणेवाडी ग्रामस्थांना स्थलांतरीत करण्यात आले होते.घारपी ग्रामस्थांची गैरसोय पाहता, दरडीचा काही भाग हटवून छोट्या वाहनांसाठी हा हा मार्ग खुला करण्यात आला होता.दरड पूर्णपणे हटवून घारपी येथे लवकरात लवकर एस. टी सेवा सुरू करू,असे आश्वासन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिले होते.त्यानुसार दरड पडलेला असनिये- घारपी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू झाले आहे.गुरुवारी दरडींचा उर्वरित भाग हटविण्यास सुरवात करण्यात आली.
दरम्यान,सावंतवाडी तहसीलदार राजराम म्हात्रे यांनी घारपी ग्रामस्थांची भेट घेत त्यांना पूरग्रस्तांचे निकष लावून तात्काळ मिळणाऱ्या भरपाईसाठी प्रयत्न करू,असे आश्वासन दिले.असनिये,घारपी येथील काजू व बागायतीच नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून भरपाई दिली जाणार आहे.घारपी येथील जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच घारपी मंदिरात शिबीर घेतले जाईल,असे त्यांनी सांगितले.यावेळी दीपक गावडे,शिवराम गावडे,आनंद गावडे,विलास गावकर, सुनील गावडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.