अतिवृष्टीचा आंबा, काजू बागायतदारांना फटका; लाखों रूपयांचे नुकसान
वैभववाडी.ता,२६: तालुक्यात तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबा, काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐनारी येथील सुरेश गंगाराम गुरव(देऊळवाडी) यांच्या चार एकरातील ५०० काजू तर श्रीकृष्ण राजाराम साईल(साईलवाडी) यांच्या तीन एकरातील ३०० काजूं कलमांवर फांदी मर(बुरशीजन्य) रोग पसरल्याने या शेतकऱ्यांचे अंदाजे ५ लाखांचे नुकसान झाले आहे.
अॉगस्टच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार झालेल्या अतिवृष्टीत आंबा, काजू बागायतदारांना मोठा फटका बसला आहे. ऐनारी येथील सुरेश गंगाराम गुरव यांच्या चार एकरातील ५०० काजू व श्रीकृष्ण राजाराम साईल यांच्या तीन एकरातील ३०० काजूंवर फांदी मर(बुरशीजन्य) रोग पसरल्याने काजू मृत पावल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनास्थळी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक चंद्रकांत इंगळे यांनी जावून पाहणी केली आहे. याबाबतचा अहवाल त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना पाठविला आहे.
_शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार_
याबाबत तालुका कृषी अधिकारी श्री. अमोल आगवान यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविणार आहोत. नुकसान भरपाई देण्यास शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.