उपाध्यक्ष, शिक्षण सभपतींचे आश्वासन
सिंधुदुर्गनगरी.ता,२६: शालेय पोषण आहार स्वयंपाकिनायावर्षी जूनपासून शासनाने मानधनात ५०० रुपयांची वाढ केली आहे.मात्र, हे मानधन हातात येण्यापूर्वीच डिगस हायस्कूल, आंब्रड हायस्कूल व आजगाव जिल्हा परिषद शाळेने चक्क स्वयंपाकी कामगार महिलांनाच कामावरून कमी केले आहे या कामगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी सोमवारी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाच्यावतीने उपोषण सुरू केले होते. दरम्यान, उपाध्यक्ष रणजीत देसाई, शिक्षण सभापती डॉ अनिशा दळवी यांनी या विषयावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या परीपत्रकाप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीने स्वयंपाकी कामगारांची नेमणूक करावयाची आहे. मात्र, त्यांना कामावरून केव्हा कमी करता येईल याला काही नियम शासनाने तयार केले आहेत. १० जुलै २०१४ च्या परिपत्रकानुसार स्वयंपाकी नियुक्त करत असताना गावातील परित्यक्ता, विधवा, गरजू गरीब महिलांना निवडावे तसेच मागासवर्गीयांना ही प्राधान्य द्यावे, असे आदेश आहेत. जिल्हा परिषद आजगाव प्राथमिक शाळेत स्वयंपाकी महिलेला कामावरून काढून त्याठिकाणी पुरुष कामगाराला ठेवण्यात आले आहे. सलग तीन दिवस आहारात खंड पडल्यास किंवा महिन्यातून पाच दिवस खंड पडणाऱ्यांना कामावरून काढून टाकता येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
स्वयंपाकीना सरसकट कमी केले जाऊ नये असेही या निर्णयात म्हटले आहे, असे असतानाही काही शाळा व्यवस्थापन समित्या मनमानी करत केव्हाही स्वयंपाकी कामगारांना काढून टाकण्याचा निर्णय घेताना दिसतात. आजगाव जि प शाळेचे मुख्याध्यापक यांनी दरवर्षी स्वयंपाकी बदलण्यात यावा, त्यामुळे अशा मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी यांनी शासनादेश तसेच निर्णयाची माहिती द्यावी संघटनेची तक्रार, संस्थेचा खुलासा यातून शिक्षणाधिकारी यांनी योग्य बाजू तपासून घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. असे असतानाही शाळा व्यवस्थापनांकडून महिला स्वयंपाकिंना अन्यायकारक रित्या कामावरुन काढले जाते. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा यासाठी संघटनेच्या अक्षता मेस्त्री, सुप्रिया तेली, श्रद्धा दळवी या स्वयंपाकिणींसह संघटनेच्या अध्यक्षा कमल परुळेकर, उपाध्यक्ष सूर्यकांत सावंत आदिंसह महिला उपोषणास बसल्या आहेत.