चंद्रकांत पाटीलांंचे आदेश :आमदार वैभव नाईक यांच्या मागणीची दखल
कणकवली
गणेशोत्सवानिमित्त कोकणात येणाऱ्या नागरिकांना मुंबई गोवा महामार्गाचा त्रास होऊ नये. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने महामार्ग सुस्थितीत करावा, ज्या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम झाले नाही अशा ठिकाणी,व डायव्हर्शन रोड वर कार्पेट करावे, अशी मागणी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. त्यावर ना. चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आवश्यक सर्व ठिकाणी कार्पेट करण्याचे आदेश महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
गणेशोत्सव सणाच्या पूर्वनियोजनाची महत्वाची बैठक मंत्रालयात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शिक्षण मंत्री आशिष शेलार, विनोद तावडे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, रत्नागिरी पालकमंत्री रवींद्र वायकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्यअभियंता श्री गायकवाड, सेक्रेटरी श्री जोशी, महामार्ग अधिक्षक अभियंता श्री. देशपांडे आदींसह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार वैभव नाईक यांनी मुंबई गोवा महामार्गासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य मार्ग व इतर मार्गहि टेंडर प्रक्रियेत आहेत. तरीही यामार्गाची तातपूर्ती दुरुस्ती करण्यासाठी यामार्गावरही कार्पेट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात यावेत असे सांगितले. हि मागणी देखील ना. चंद्रकांत पाटील यांनी मान्य केली आहे.
यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी आंबोली घाटाचे रखडलेले काम सुरु करण्याच्या सूचना केल्या. तसेच कोकणातील जनतेसाठी टोलमाफी करण्याची मागणी केली. यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.