उत्कृष्ट अभिनयासाठी भूमिकेचा “आत्मा” सापडणे गरजेचे…

2

माधव अभ्यंकर ;जयहिंद ग्रामोन्नती संस्थेच्या “गप्पा-टप्पां” कार्यक्रमात प्रतिपादन…

कुडाळ ता.३०: भूमिका साकारण्याची एक गंमत असते.कलाकाराला त्या भूमिकेचा आत्मा सापडावा लागतो.हा आत्मा सापडला तर त्याच्या हातून ती भूमिका चांगली होते.एवढेच नव्हे तर त्या भूमिकेचे सोने होते.मग त्या कलाकाराला आणि रसिकांनाही त्यातून आनंद मिळतो.माणूस आणि नट यांच्यामध्ये पुसटशी पण रसिकांना न दिसणारी अशी एक रेषा आहे.नाटकाचा प्रयोग किंवा सिरियलचं शूटींग सुरु होण्यापूर्वी मी अभ्यंकर असतो व ही रेषा ओलांडून प्रवेश करतो तेव्हा त्यातील भूमिकेतील मी कलाकार असतो,असे प्रतिपादन ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील अण्णा नाईकांची लोकप्रिय भुमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांनी आज येथे केले.
साळगाव येथील जयहिंद ग्रामोन्नती संस्थेत अभ्यंकर यांचा गप्पा टप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी मुख्यमंत्र्यांचे माजी जनसंपर्क अधिकारी सतीश पाटणकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ऍड .संतोष सावंत तसेच संस्थेचे सिनियर एक्झिक्युटीव्ह प्रवीण प्रभुकेळुसकर,दत्तप्रसाद पाटणकर, प्राचार्य सच्चीदानंद कनयाळकर, प्रा. टेरी डेसा उपस्थित होते.
भुमिका करणे म्हणजे भूमिका जगणे असते. भूमिका करणे हा परकायाप्रवेश आहे. भूमिका जगण्याची एक गंमत असते . कलाकार म्हणून काम करताना पटकथा , दिग्दर्शक आणि त्या संहितेला न्याय द्यावा लागतो . अभिनयाचा फील घेणे वेगळे आणि अभिनयामध्ये वेडं होणे वेगळे . कलाकार म्हणून भुमिका करताना त्या व्यक्तिरेखेचा फील रसिकांना दिला पाहिजे . सध्याच्या काळात मुलांवर संस्कार करण्यासाठी आई – वडिलांकडे पुरेसा वेळ नाही . ते काम नाटक , सिनेमा , सिरीयल या माध्यमांनी करायला हवे , असे सांगून अभ्यंकर पुढे म्हणाले की , आज झपाटयाने होणारा सामाजिक बदल नाटक , सिनेमा आणि सीरियलमध्ये आला आहे . हा बदल कलाकाराला स्वीकारावा लागतो . स्क्रिप्ट आणि अभिनयाची संधी या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत . कारण चांगला नट होण्यासाठी भूमिकांमध्ये वेगळेपणा असायलाच हवा . अभिनय चांगला करून भुमिकेला न्याय दिलेली नाटके किंवा सिरीयल चांगली होतात, असेही अभ्यंकर यानी शेवटी सांगितले . तसेच अभिनय करायची पूर्ण तयारी असेल तरच या माध्यमाकडे या. एवढंच मला तरुणांना सांगायचे आहे . त्यामुळे अभिनय , हार्ड वर्क आणि स्वतःचे विचार या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत, असे ते म्हणाले . सावंतवाडी येथे आम्ही कोंकण विभागाचे चित्रपट महामंडळाचे कार्यालय सुरु केले आहे . कोंकणात या क्षेत्रात भरपूर टॅलेंट आहे . या कार्यालयामुळे नवोदित कलाकारांना संधी मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .
यावेळी ऍड . संतोष सावंत , सतीश पाटणकर यांनी विचार मांडले . विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे अभ्यंकर यांनी निरसन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयूर शारबिद्रे यांनी केले .
यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात माधव अभ्यंकर व इतरांच्या हस्ते शंभर काजू कलमांचे वृक्षारोपण करण्यात आले

22

4