सावंतवाडी, ता. ३१ : पालकमंत्री दीपक केसरकर हेच मुळात भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे त्यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची धास्ती घेतली आहे व ते उलटसुलट बडबडत आहेत असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते संदीप कुडतरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. केसरकर यांची अखेरची फडफड आहे. पुन्हा निवडून येणार नसल्याने ते टोकाला जाऊन राणेंवर टीका करत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. कुडतरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले केसरकर दगाबाजीचे आणि धूर्त राजकारण करून राजकारणात यशस्वी झाले आहेत. ज्या प्रवीण भोसले यांच्या हाताला धरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला त्यांना त्यानंतर विसरले. पालकमंत्री दीपक केसरकर राणेंच्या माध्यमातून आमदार, मंत्री झाले. त्यानंतरही त्यांनी राणेंच्या विरोधात काम केले. राणेंनी आपले पैसे खर्च करून केसरकरांना निवडून आणले. त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केसरकर वारंवार करत आहेत. त्यांनी जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास केलेला नाही. केवळ घोषणा करून लोकांना कोट्यवधी रुपये आणल्याचे ते सांगतात. मात्र हे पैसे कुठे खर्च झाले हा संशोधनाचा विषय आहे असे त्यांनी सांगितले.