खास. राऊत ; वैभव नाईक बहुमताने विजयी होतील…
मालवण, ता. ८ : प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाची गंगा पोचविण्यासाठी शिवसेनेचे काम सुरू आहे. जनतेला अपेक्षित विकास यापुढेही साध्य केला जाईल. केंद्रात ज्याप्रमाणे युती सरकार पुन्हा स्थापन झाले. त्याच धर्तीवर महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा युतीचा भगवा फडकेल. आमदार वैभव नाईक यांनी पाच वर्षात केलेला विकास व जनतेशी ठेवलेला संपर्क पाहता ते पुन्हा बहुमतांनी विजयी होतील असा विश्वासही खासदार विनायक राऊत यांनी आज तळगाव येथे व्यक्त केला.
खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आज तळगाव येथे करण्यात आले. यावेळी खासदार राऊत, आमदार नाईक, मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, सरपंच अनधा वेंगुर्लेकर, उपसरपंच संतोष पेडणेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शाखाप्रमुख प्रसाद दळवी, बाबा आंगणे यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार निधीतून तळगाव पेडवेवाडी-बौद्धवाडी रस्ता घाटी बसवणे व डांबरीकरण, स्ट्रीट लाईट विद्युत खांब उभारणी शुभारंभ तसेच मांडकर सेवासंघ परिवार सभागृह समोर पेव्हर ब्लॉक बसवणे व बैठकीची जागा या कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी दत्ता दळवी यांनी आमदार नाईक मंत्री होतील अशा सदिच्छा व्यक्त केली.