पावसाळ्यापूर्वीच सतर्कतेचा इशारा देऊन सुद्धा महावितरण विभाग आदेशांन पासून अलिप्त…

64
2
Google search engine
Google search engine

महेश कुबल; नंबर ब्लॉक केल्याचा आरोप, कामे मार्गी लावा अन्यथा पुढचे पाऊल उचलू…

बांदा,ता.१२: पावसाळ्यापूर्वीच सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने देऊन सुद्धा महावितरण विभाग यापासून अलिप्त राहिल्याचे पहिल्याच पावसात दिसून आले, विजे संदर्भात माहिती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी नंबरच ब्लॉक केला, असा आरोप पाडलोस ठाकरे शिवसेनेचे शाखाप्रमुख महेश कुबल यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांवर केला आहे. दरम्यान येत्या ५ दिवसात सर्व कामे मार्गी लावा अन्यथा पुढचे पाऊल उचलू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे पाडलोस, दांडेली भागात अपुऱ्या वीज पुरवठ्याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व विभागांनी सतर्क राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाला दिले होते. परंतु महावितरण विभाग यापासून अलिप्त राहिला असल्याचे पहिल्याच पावसात दिसून आले. शनिवारी झालेल्या वादळी पावसामुळे पाडलोस, दांडेली भागात विजेचा खेळ खंडोबा झाला. वाढत्या उष्म्यामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांना शनिवारी पूर्ण रात्र विजेविना काढावी लागली. काही व्यापाऱ्यांचे नुकसानही झाले. पावसाळा तोंडावर आला असून महावितरण विभागाची अशी कार्यवाही ग्राहकांना पावसाळ्यात चिंताजनक ठरणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान विजेसंदर्भात माहिती देण्यासाठी बांदा येथील अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी नंबरच ब्लॉक केल्याचे महेश कुबल यांनी सांगितले. कोणताही अपघात घडल्यास त्याची माहिती कशी द्यायची? असा सवाल करत संबंधित बांदा येथील अधिकाऱ्यांंची तक्रारही सावंतवाडी उपअभियंता यांच्याकडे केल्याचे कुबल यांनी सांगितले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणांनी सज्ज रहावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत. मात्र महावितरण विभाग मान्सूनपूर्व कामगिरी पासून अद्याप दूरच असल्याचे शनिवारी दिसून आले.

शनिवारी संध्याकाळी मडुरा पंचक्रोशीत वादळी पाऊस सुरू झाला. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा खंडित झाला. रविवारी दिवसभर विजेचा लपंडाव सुरूच होता. गेल्यावर्षी पाडलोस रवळनाथ मंदिरात सावंतवाडी उपअभियंता चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दुरुस्तीची अनेक आश्वासने अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचे महेश कुबल यांनी सांगितले. शनिवारी झालेल्या पावसात उन्हाळी कामे झाली नसल्याने महावितरण विभागाचा भोंगळ कारभार पहिल्या पावसातच दिसून आला. येत्या पाच दिवसांत सर्व कामे मार्गी लावा अन्यथा पुढचे पाऊल टाकावे लागणार असा इशारा श्री. कुबल यांनी दिला आहे.