वैभववाडी.ता,१२: वैभववाडी तालुक्यात अकरा दिवसाच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात शांततेत पार पडले. विर्सजनावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी वैभववाडी पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
अकरा दिवसाच्या उत्सावानंतर अनंतचतुर्दशीला घरगुती तसेच वैभववाडी शहरातील सार्वजनिक गणपतींचेही विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या !अशा घोषणा देत ढोल ताशाच्या गजरात, फटाक्याची अतिशबाजी, गुलालाची उधळण करीत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालत भक्तीभावाने निरोप दिला.
तालुक्यातील गावांमध्ये गावातील नदी ओहळावर असलेल्या गणपती विसर्जन घाटावर विसर्जन केले. घाटावर एकत्रित गणपतींची आरती घेऊन, आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करा. असे साकडे गणपती बाप्पाला भक्तांनी घातले. त्यानंतर गणपती बाप्पांचे पाण्यात विसर्जन करण्यात आले.
_विसर्जनानंतर गाव झाले सुनेसुने_
गेले दहा दिवस गणपती बाप्पांच्या घरोघरी झालेल्या आगमनाने गावात उत्साही, भक्तीमय वातावरण होते. गणेशोत्सवासाठी गावात चाकरमानीही मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यामुळे गावात सगळीकडे गजबजाट, उत्साही वातावर होते. बाप्पाच्या विसर्जनानंतर सगळीकडे शुकशुकाट झाला आहे. चाकरमानी जडअंतकरणांने परतीच्या प्रवासाला निघाले. त्यामुळे गाव सुनेसुने झाले आहे.
फोटो- अकराव्या दिवशी गणपती विसर्जन करतांना भक्तगण छाया- पंकज मोरे