Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यास्पर्धेत टिकणारे यश विद्यार्थ्यांनी मिळवायला हवे...

स्पर्धेत टिकणारे यश विद्यार्थ्यांनी मिळवायला हवे…

वैभव नाईक; दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

मालवण, ता. २२ : दहावी, बारावी परीक्षेत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्तम असे यश मिळविले आहे. या विद्यार्थ्यांनी मालवणातील गुणवंतांची परंपरा कायम राखली असून ही परंपरा यापुढेही सुरूच राहिली पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. त्यामुळे दहावी व बारावीत यश मिळविले तरीही पुढील वाटचालीत विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकणारे यश मिळविले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी येथे केले.

आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना मालवणच्या वतीने तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज वायरी येथील आर. जी. चव्हाण हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक नितिन वाळके, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य मंदार सावंत, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, युवतीसेना प्रमुख अधिकारी शिल्पा खोत, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, युवतीसेना तालुकाप्रमुख नीनाक्षी मेतर, युवतीसेना उपविभागप्रमुख सोनाली डिचोलकर आदी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील प्रत्येक हायस्कुल मधील दहावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या तसेच तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील बारावी परीक्षेत शाखा निहाय प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आमदार नाईक म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांनी वाचन वाढविले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करावी. दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीत प्रवेश प्रक्रिया, विविध दाखले मिळविण्यात येणाऱ्या अडचणी ठाकरे शिवसेनेकडून सोडविण्यात येतील.

श्री. वाळके म्हणाले, आज विविध भरती प्रक्रियेमध्ये छोट्या छोट्या पदासाठी उच्चशिक्षित तरुणही अर्ज करत आहेत. स्पर्धा मोठी असल्याने केवळ पुस्तकी ज्ञानावर मिळालेल्या शिक्षणावर अवलंबून न राहता इतर कला कौशल्ये विकसित करणे, जीवनात कष्ट करणे आवश्यक आहे. हरी खोबरेकर यांनी विद्यार्थ्यांनी शिकत राहिले पाहिजे, प्रत्येक क्षेत्रात होणारे बदल स्वीकारत प्रगती साधली पाहिजे असे सांगितले. यावेळी भाई गोवेकर, प्राचार्य मंदार सावंत, मंदार ओरसकर, पूनम चव्हाण, शिल्पा खोत यांनीही मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

सूत्रसंचालन अनंत पाटकर यांनी केले. यावेळी सन्मेष परब, माधुरी प्रभू, दत्ता पोईपकर, राजेश गावकर, बंड्या सरमळकर, चंदू खोबरेकर, नाना नाईक, चिंतामणी मयेकर, हेमंत मोंडकर, उमेश मांजरेकर, अमित भोगले, दर्शन म्हाडगुत, वंदेश ढोलम इतर कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments