२ कोटी ७२ लाख ९३ हजार २४ रूपये वसूली
सिंधुदुर्गनगरी-प्रतिनिधी
राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये दाखल व दाखलपूर्व अशा ३८६६ प्रकरणांपैकी २५५ प्रकरणांमध्ये आज शनिवारी समझोता झाला आहे. यातून एकूण २ कोटी ७२ लाख ९३ हजार २४ रुपये वसूल करण्यात आले आहेत अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. अतुल उबाळे यांनी दिली.
विधी सेवा प्राधिकरण विभागामार्फत दर तीन महिन्यानी राष्ट्रिय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार राष्ट्रिय लोकअदालत जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये आज आयोजित करण्यात आली होती. आपापसातील वादांना तडजोडीने पूर्णविराम देण्यासाठीच्या या लोकअदालतीत सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा न्यायालयासह एकूण आठ न्यायालयांमध्ये दाखलपूर्व ३२१७ व दाखल ६४९ अशी एकूण ३८६६ प्रकरणे ठेवण्यात आली होती.
यापैकी दाखल पूर्व १८२ प्रकरणांमध्ये समझोता झाला आहे. यामधून ३७ लाख ६५ हजार १७६ रुपये वसूल करण्यात आले. तर दाखल प्रकरणांपैकी ७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून यामधून २ कोटी ३५ लाख २७ हजार ८४८ रुपये वसूल करण्यात आले.
दाखल पूर्व व दाखल अशा एकूण २५५ प्रकरणांमध्ये समझोता झाला असून त्यातून २ कोटी ७२ लाख ९३ हजार २४ रुपये वसुल करण्यात आले आहेत. सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी आर कदम, जिल्हा न्यायाधीश २ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी रोटे व् मुख्य न्यायदंडाधिकारी सौ. वर्षाराणी पत्रावळे यांच्या अध्यक्षतेखालील तिन मंडळांमधून ही लोकअदालत घेण्यात आली.