बॅकवाॅटर परिसराचा सभावेश:शंभर एकरहुन अधिक जागेचा होणार वापर…
सावंतवाडी/दत्तप्रसाद पोकळे.ता,१६: दोडामार्ग व लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जंगली हत्तींच्या उपद्रवावर मात करण्यासाठी केलेल्या अनेक अयशस्वी प्रयत्नानंतर आता राज्याच्या वनविभागाने तिलारी बॅकवॉटर परिसरात हत्तींसाठी “अन्न-अधिवास” निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.तिलारी बॅकवॉटर परिसरात हत्तींचा अधिवास तयार करण्यासाठी जवळपास १०० हेक्टर क्षेत्रामधील पाणवठे व जंगलाच्या सीमेवर बांबू तसेच फळ देणारी अनेक झाडे लावली जाणार असून,हत्ती मानवी वस्तीत प्रवेश करू नये,याची काळजी घेतली जाणार आहे.त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील घाटकरवाडी येथे हत्तींची छावणीही उभारली जाणार आहे.हे दोन्ही प्रस्ताव राज्यशासनास सादर करण्यात आले आहेत.
कोल्हापूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांनी यास दुजोरा दिला आहे.तिलारी धरण परीसरातील दोन गावांचे पुर्नवसन झाल्यामुळे १०० हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे.या क्षेत्रात पूर्वी मोठ्या प्रमाणात शेती केली जायची.आता या क्षेत्रात चांगल्या प्रतीचे गवत तसेच बांबूची लागवड योग्य पद्धतीने केली जाणार आहे.फणसाची लागवडही केली जाणार आहे.हत्तींनी येथे मुबलक प्रमाणात अन्न व पाणी उपलब्ध करून दिल्याने त्यांचे अधिवास या क्षेत्रात निर्माण होणार आहेत. व त्यांचा मानवी वस्तीमधील हस्तक्षेप थांबणार आहे.आजरा-घाटकरवाडी येथे हत्तींच्या छावणीच्या प्रस्तावावरही वनविभाग विचार करत आहे.तेथे हत्तींना ताब्यात घेण्यासाठी क्रॉल्स असणार आहे.कर्नाटक वनविभागाच्या तज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे.तिलारी बॅकवॉटर परिसरात एलिफंट रिसर्व उभारण्याचाही प्रस्ताव होता,मात्र मायनिंग व इतर कारणांमुळे तो मागे पडल्याची चर्चा आहे.
सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ९ जंगली हत्तींचा वावर आहे.दोडामार्ग व आजरा परिसरात या हत्तींनी मोठया प्रमाणात शेती-बागायतीचे नुकसान केले.असून ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.गतवर्षी वनविभागाकडे शेती व बागायतीच्या हत्तींनी केलेल्या नुकसानीच्या १,१२७ घटनांची नोंद आहे.वनविभागाकडून नूकसानभरपाई म्हणून १.०४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
यापूर्वी हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी केलेले एलिफंट फ्रुफ टेंच, सौर कुंपण,एलिफंट गो बॅक सारखे उपाय असफल ठरले होते.