आडेली सरपंचांच्या खोट्या वल्गना नको…

2

शिवसैनिकांचा इशारा; लोकांची दिशाभूल थांबवा…

वेंगुर्ले ता.२१: मागील पावणे दोन वर्षापासून आतापर्यंत आडेली गावात पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत व शिवसेना संघटनेच्‍या माध्‍यमातून व महाराष्‍ट्र शासनाच्‍या विविध योजनेतून सुमारे ५ ते ६ कोटी रुपयांची विकास कामे मंजूर झाली आहेत.त्‍यापैकी काही कामे पूर्ण झालेली आहेत अजूनही बरीच विकास कामे मंजूर होणे बाकी आहे. तसेच वैयक्‍तीक रित्‍या सुमारे ८ ते १० लक्ष रुपयांची कामे आडेली शिवसेनेच्‍या माध्‍यमातून केलेली आहेत ही वस्‍तूस्थिती आहे.त्यामुळे आडेली सरपंच समिधा कुडाळकर यांनी खोट्या वल्‍गना करुन लोकांच्‍या डोळयात धुळफेक करु नये असा इशारा आडेलीतील शिवसैनिकांनी दिला आहे.
मागील पंधरा दिवसात आडेली गावातील विविध १८ विकास कामांची भूमीपूजने श्री. केसरकर यांच्‍या आदेशान्‍वये जिल्‍हा नियोजन समितीचे सदस्‍य व शिवसेना जिल्‍हाप्रमूख संजय पडते, वेंगुर्ला पं.स सभापती सुनील मोरजकर, शिवसेना नेते, पदाधीकारी यांच्‍या हस्‍ते झालेली आहेत. सदरच्‍या समारंभाला संपूर्ण गावातील बहुतांश लोक उपस्थित होते. आतापर्यंत आडेली गावात झालेली मंजुर विकास कामे कोणामूळे झाली ती त्‍या – त्‍या वाडीतील व गावातील सुज्ञ जनतेला माहीत आहेत त्‍यासाठी सरपंचाच्‍या प्रमाणपत्राची गरज वाटत नाही. जर शिवसेनेने केलेल्‍या विकास कामांच्‍या भूमीपूजनामूळे जर सरपंचाना पोटशूळ होत असेल तर त्‍यांनी विकास कामे मंजूर करुन आणावीत व खुशाल भूमीपूजने करावीत. आम्‍ही त्‍यांचे स्‍वागतच करु. तसेच शिवसेनेच्‍या माध्‍यमातून होणाऱ्या विकास कामांचे भूमीपूजने व उद्घाटने हे शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व शिवसैनीक यांच्‍याच हस्‍ते व्‍हावीत अशी आडेली गावातील स्‍थानिक लोकांचा आग्रह होता. त्यामुळे तशी झाली.
राहिला प्रश्‍न विकासकामांच्‍या प्रस्‍तावाचा तर सरपंच कुडाळकर यांनी कोणत्‍या कामाचे प्रस्‍ताव कोणाकडे दिले व कोणत्‍या योजनेतून कामे मंजूर करुन घेतली हे आडेलीतील जनतेला त्‍यांच्‍याकडे असण्‍याच्‍या प्रस्‍तावाच्‍या प्रती सादर करुन दाखवाव्‍यात. नुसती पत्रकबाजी करु नये. सौ.कुडाळकर यांनी सरपंच पदाचा कारभार हातात घेतल्‍यापासून दहा महिने सरपंच अध्‍यक्ष असलेल्‍या गावाच्‍या विकासासाठी शासनाने निर्माण केलेल्‍या विविध समितीची एकही बैठक घेता आली नाही तेव्‍हा सर्व ग्रामपंचायत सदस्‍यांनी सरपंच अकार्यक्षम असल्‍याचा ठराव घेतल्‍यानंतर सरपंचाना बैठका घेण्‍याची जाग आली. अशी ग्रामपंचायतीच्‍या दप्‍तरी नोंद आहे. अशा काम न करणाऱ्या अकार्यक्षम सरपंचांनी आपणच काम करत असल्‍याचा आव आणू नये असेही स्पष्ट केले आहे.

25

4