विर्डी, बापार्डे ठरल्या जिल्हा स्मार्ट ग्राम पंचायती

2

जिल्हास्तरासाठी ११ ग्रां.प. चे झाले होते मूल्यमापन

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण विकासासाठी सुरु केलेल्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर दोडामार्ग तालुक्यातील विर्डी व देवगड तालुक्यातील बापार्डे या दोन ग्राम पंचायतींनी विभागून बाजी मारली आहे. शासनाने हा निकाल जाहिर केला असून दोन्ही ग्राम पंचायतींना विभागून प्रत्येकी 20 लाख रूपये बक्षीस मिळणार आहे.
जिल्ह्यातील अकरा ग्राम पंचायतींची जिल्हा स्मार्ट ग्राम पंचायत मूल्यमापनसाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय पाच अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे. या समितीने तालुका मूल्यमापननंतर तीन महिन्यात त्या ग्राम पंचायतीने केलेल्या कामांचे मूल्यमापन केले होते. त्यानंतर सादर अहवाल सादर करण्यात आला होता. केलेल्या मूल्यांकनात सर्वाधिक गुण असलेल्या ग्राम पंचायतीला जिल्हा स्मार्ट ग्राम पंचायत म्हणून जाहीर करण्यात आले.
तालुकास्तरीय मूल्यमापन मधून अकरा ग्राम पंचायती जिल्हा स्मार्ट ग्राम मूल्यमापनसाठी पात्र ठरल्या आहेत. यामध्ये कुडाळ- तुळसुली क. नारूर (९४ टक्के), मालवण- बुधवळे-कुडोपी (९३ टक्के), देवगड- बापार्डे (९२ टक्के), वेंगुर्ले- भोगवे (८७ टक्के) व कोचरा (८७ टक्के), दोडामार्ग- विर्डी (८१.५० टक्के), व कुडासे खुर्द (८१.५० टक्के), सावंतवाडी- माजगांव (७९ टक्के), व निरवडे (७९ टक्के), कणकवली-हरकुळ बु. (७३.५० टक्के), वैभववाडी- मांगवली (६५ टक्के) या ग्राम पंचायतचा समावेश होता. यातून जिल्हा स्मार्ट ग्रामची निवड करण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता व बांधकाम कार्यकारी अभियंता यांची निवड करण्यात आली होती. या समितीने हे मूल्यमापन केले असून मंगळवारी हा निकाल जाहिर करण्यात आला. जिल्हास्तरावर यश मिळाल्याबद्दल विर्डी व बापार्डे या ग्राम पंचायतींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

8

4