दिलीप सांगवेकर; “त्या” दोघांचाही भाजपाशी संबंध नाही…
मालवण,ता.३१: कुंभारमाठ गावातील माजी सरपंच वैशाली गावकर आणि तृप्ती लंगोटे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात या दोघांचाही भाजपाशी संबंध नाही. त्या ठाकरे शिवसेने मध्येच कार्यरत होत्या. निवडणुकीच्या तोंडावर स्वतःच्याच कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश दाखवण्याची वेळ वैभव नाईक यांच्यावर आली असून जनता सुज्ञ आहे. त्यांच्या या भुलथापांना बळी पडणार नाही. या निवडणुकीच्या निकालानंतर वैभव नाईक यांचे पार्सल कणकवलीला परत पाठवणारच, अशी प्रतिक्रिया भाजपचे बूथ अध्यक्ष दिलीप सांगवेकर यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, वैशाली गावकर यांचा आजपर्यंत एकदाही भाजपाशी संबंध आला नव्हता. तर तृप्ती लंगोटे यांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपात बंडखोरी करून सरपंच पदाची निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांची त्याचवेळी हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्या ठाकरे शिवसेनेमध्येच सक्रिय होत्या. पण त्यांनी सरपंच निवडणुकीत ठाकरे गटाच्या च्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवल्याने गावातील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी त्यांना पक्षात घेण्यास विरोध दर्शवला होता. मागील लोकसभा निवडणुकीत या दोघीही जणी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारात सक्रिय होत्या. तरीदेखील गावातून खासदार नारायण राणे यांना ७० % मते मिळाली. आताच्या निवडणुकीत वैभव नाईकांकडे कोणीही नसल्याने या दोघांना पक्षात घेण्यात आले. मात्र लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांना राणे समर्थक असल्याचे लेबल लावण्यात आले. परंतु, या दोघांचाही भाजपा अथवा राणे कुटुंबाशी संबंध नाही. या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना गावातून ८० ते ९०% मतदान मिळवून देणारच असे श्री. सांगवेकर यांनी म्हटले आहे.