परशुराम उपरकर : भाजपमधील निष्ठावंत अडगळीत जाणार..
कणकवली, ता.5 :
कणकवली मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेला उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे स्वाभिमानमधून आलेल्या नीतेश राणेंना भाजपने तर सतीश सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन दुसर्यांची बाळं आपल्या मांडीवर खेळवण्याचा प्रकार सुरू केला असल्याची टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज येथे केला. राणे भाजपमध्ये आल्याने पुढील काळात राणे समर्थकांचा पक्षावर वरचष्मा राहील आणि भाजपचे निष्ठावंत अडगळीत जातील अशीही भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच जनाधार संपलेल्या राणेंना पुन्हा ऊर्जा देण्याचं काम भाजप करतंय असेही ते म्हणाले.
येथील मनसे कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, राणे आणि स्वाभिमान पक्षाला शिवसेना-भाजप हे पक्ष संपवायला निघाले होते. पण राणे आज भाजपमध्ये जाऊन युतीच्या डोक्यावर बसले आहेत. तर सातत्याने राणे कुटुंबीयांवर टीका करणारी भाजपची नेतेमंडळी आज राणेंच्याच मांडीला मांडी लावून बसत आहेत. हे भाजपच्या निष्ठावंतांना सहन होणारे नाही. राणे ज्या पक्षात जातात तो गिळंकृत करतात. पक्षातील सर्व पदांवर राणे समर्थकांचेच वर्चस्व असते. त्यामुळे भाजप निष्ठावंत देखील अडगळीत जाण्याची भीती असल्याचे श्री.उपरकर म्हणाले.