कणकवली,ता.१०: सिंधुदुर्गात ऊस उत्पादन सतत वाढत आहे. इथल्या शेतकर्यांना दोन ते अडीच तास कापून घाटमाथ्यावर ऊस घालावा लागतो. ऊस उत्पादक शेतकर्यांची ही वणवण थांबविण्यासाठी लवकरच वैभववाडीत साखर कारखाना सुरू करणार आहोत. मुंबई बँकेच्या माध्यमातून त्याला आर्थिक साहाय्य केले जाईल. तसेच पाच वर्षात हा कारखाना कार्यान्वित होईल अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.
श्री.दरेकर म्हणाले, आमदार नीतेश राणेंसोबत प्रचारासाठी वैभववाडी परिसरात फिरताना त्या भागात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे दिसून आले. तसेच कोकणात चांगले प्रकल्प यावेत अशीही भूमिका भाजपची आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात साखर कारखाना सुरू करण्याचे नियोजन आम्ही केले आहे. निवडणूक संपल्यानंतर लगेचच कारखान्याच्या परवानग्या घेतल्या जातील तर यंत्रसामग्री व इतर आवश्यक कामांची पूर्तता होऊन पाच वर्षात हा कारखाना कार्यान्वित होणार आहे.