Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यागोव्यात १७ ते १९ मे या कालावधीत "सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव"...

गोव्यात १७ ते १९ मे या कालावधीत “सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव”…

अभय वर्तक; सिंधुदुर्गातून १ हजार ५०० हून अधिक हिंदू सहभागी होणार

 

कुडाळ,ता.०९: सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर “विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा” चा शंखनाद करण्यासाठी १७ ते १९ मे या कालावधीत गोव्यात “सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक महोत्सवात राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे कार्यकर्ते, विचारवंत, केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह २५ हजारांहून अधिक साधक आणि धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत. हा महोत्सव रामराज्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक अभय वर्तक यांनी कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कुडाळ येथील हॉटेल कोकण स्पाईस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्‌गुरु सत्यवान कदम, राजेंद्र पाटील आणि हिंदुत्ववादी विवेक पंडित उपस्थित होते. श्री. वर्तक यांनी सांगितले की, सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशात रामराज्य-स्वरूपातील “सनातन राष्ट्रा” साठी सामूहिक संकल्प करण्यात आला आहे. या महोत्सवामुळे विविध आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटनांमधील धर्मबंधुत्व अधिक दृढ होईल. सध्या भारतासमोर असलेल्या अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सनातन धर्म, त्याची मूल्ये आणि त्याचे रक्षण अत्यंत आवश्यक आहे. गो, गंगा, गायत्री, मंदिरे आणि वेदादी धर्मग्रंथांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळवून देणाऱ्या ‘सनातन राष्ट्रा’चा शंखनाद या महोत्सवात करण्यात येणार आहे. फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणारा हा लोकोत्सव धर्म आणि अध्यात्म यांची ज्ञानगंगा प्रवाहित करेल.

या महोत्सवासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री. रविशंकर, पतंजली योगपीठाचे संस्थापक योगऋषि स्वामी रामदेवजी, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि, सनातन बोर्डचे प्रणेते पूज्यश्री देवकीनंदन ठाकूर महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तेलंगाणातील भाजप आमदार टी. राजासिंह, तसेच काशी-मथुरा येथील मंदिरांचा खटला लढवणारे ॲड. विष्णू जैन, पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

सद्‌गुरु सत्यवान कदम यांनी सांगितले की, या महोत्सवात समर्थ रामदास स्वामी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गुरू भक्तराज महाराज, सज्जनगडचे श्रीधरस्वामी, कानिफनाथ स्वामी, माणगाव येथील टेब्ये स्वामी महाराज, श्री साईबाबा, गोंदवलेकर महाराज आणि गगनगिरी महाराज यांसारख्या १० हून अधिक संतांच्या पादुकांचे एकत्रित दर्शन घेता येणार आहे. तसेच रामराज्याच्या संकल्पासाठी १ कोटी नामजपयज्ञ आयोजित करण्यात येणार आहे. विवेक पंडित यांनी सांगितले की, हिंदू धर्मात सर्व समाजाचे कल्याण आहे आणि या धर्मामुळे देशात सलोखा निर्माण होऊन सर्वांना एकत्र पुढे जाता येईल. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव हा एक स्तुत्य उपक्रम आहे. हिंदू धर्मासाठी कार्य करणाऱ्या हिंदू वीरांना ‘हिंदू राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार संतांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्राचीन शस्त्रे, सनातन संस्कृती, राष्ट्र कला, आयुर्वेद आणि आध्यात्मिक वस्तूंचे प्रदर्शनही आयोजित केले जाईल. राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, राष्ट्राच्या प्रगतीसाठी हिंदू राष्ट्र हाच एकमेव उपाय आहे. हिंदू राष्ट्र अस्तित्वात आल्यासच धर्माधिष्ठित जीवन जगता येईल. या महोत्सवात हिंदू राष्ट्राच्या ध्वजाचे अनावरण होणार आहे. देशभरातील संतांच्या वाणीतून सनातन राष्ट्राचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संतसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच १९ मे ला विश्वकल्याण आणि हिंदुत्ववाद्यांच्या आरोग्यासाठी महाधन्वंतरी यज्ञ होणार आहे. या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १ हजार ५०० हून अधिक साधक आणि धर्मप्रेमी हिंदू गोव्यात उपस्थित राहणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments