कणकवली,ता.१०: करंजे येथील कै. तातू सीताराम राणे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून व कु. अभिराज निलेश राणे याच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या गोवर्धन गोशाळेचा शुभारंभ उद्या ११ मे ला दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
करंजे गावात ७० एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या गो-शाळेत गीर, साहीवाल, देवणी, पुंगनूर, खिल्लार आणि स्थानिक कोकण कपिला यासह शंभरहून अधिक गाईंच्या विविध जातींचे संगोपन केले जाणार आहे. या गो-शाळेत दूधापासून विविध पदार्थ आणि उत्पादने तयार करण्यात येणार असून, त्यांची विक्रीही होणार आहे. याशिवाय, गोमूत्रापासून औषधे आणि खते, गोबरापासून गोबरगॅस आणि रंग तयार करण्याचे नियोजन आहे. गो-शाळेसोबतच शेळी-मेंढी पालन आणि कुक्कुटपालन प्रकल्पही सुरू होणार आहेत.
हा प्रकल्प करंजे आणि आसपासच्या गावांतील तरुण-तरुणींसाठी रोजगाराची मोठी संधी घेऊन येणार आहे. याशिवाय, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, खत निर्मिती आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती यासारख्या विषयांवर चर्चासत्रे, अभ्यास शिबिरे आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. खासदार नारायण राणे यांनी नुकतीच ही माहिती जाहीर केली.
गोवर्धन गो-शाळा केवळ पशुपालन केंद्र नसून, ती एक पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित होणार आहे. याठिकाणी पर्यटकांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था केली जाणार आहे. भेट देणाऱ्या पर्यटकांना चुलीवर बनवलेले पारंपरिक जेवण उपलब्ध होईल. यासाठी स्थानिक महिला बचत गटांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे राणे यांनी सांगितले. तसेच, भाकड गाईंसाठी स्वतंत्र भव्य शेड उभारले जात आहे.
हा प्रकल्प स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासह ग्रामीण भागातील तरुणांना स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाची संधी देणार आहे. गोवर्धन गो-शाळा प्रकल्पामुळे कणकवली तालुक्यातील करंजे गाव आता पशुपालन आणि पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येण्याच्या मार्गावर आहे.
तरीही याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, नितेश राणे, शिक्षक प्रसारक मंडळ अध्यक्ष निलम राणे, प्रियांका राणे, ऋतुजा राणे, अभिराज राणे, निमिश राणे यांनी केले आहे.