16 रोजी पुढील भूमिका ठरवणार : कार्यकर्त्यांना पक्षाने सोडले वार्यावर
कणकवली, ता.13 : कणकवली नगरपंचायतीमधील पराभवानंतर काँग्रेस पक्षाने कणकवलीतील कार्यकर्ते, पदाधिकार्यांकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. कार्यकर्त्यांची साधी चौकशी देखील केलेली नाही. याबाबतची सविस्तर अहवाल 16 रोजी सिंधुदुर्गात येणार्या पक्ष निरीक्षकांना देणार आहोत. त्याच दिवशी आम्ही आमची पुढील भूमिका जाहीर करू अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महिंद्र सावंत, शहराध्यक्ष विलास कोरगावकर, महिला शहराध्यक्ष दिव्या साळगावकर यांच्यासह महेश तेली, महेश कोदे, राजू वर्णे, दिनेश साळगावकर, भिवा परब आदींनी दिली.
काँग्रेस पदाधिकार्यांनी आज कणकवलीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. विलास कोरगावकर म्हणाले,कणकवली नगरपंचायत निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीने लढवली होती. त्यावेळी प्रचाराला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येण्याचे कबूल केले होते. मात्र त्यांनी निवडणुकीत कुठलीही मदत केली नाही. त्यामुळे काँग्रेस उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस पदाधिकार्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे आम्ही काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नाराज आहोत. आम्ही आमची पुढील भूमिका 16 ऑक्टोबरला जाहीर करणार आहोत. दरम्यान सर्वच कार्यकर्ते नाराज असल्याने कणकवली मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात फारसे सक्रिय झालेले नाहीत. तसेच काँग्रेसचे माजी आमदार विजय सावंत यांनी शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांना दिलेला पाठिंबा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे असेही श्री.कोरगावकर म्हणाले.