पालकमंत्र्यांच्या सूचना; विशेष पॅकेज देवून डिसेंबरपूर्वी अंडरग्राउंड वीज वाहिन्यांचे काम…
सिंधुदुर्गनगरी, ता.२४: जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी आणि खाते प्रमुखांनी “अलर्ट” राहावे. सर्वांनी समन्वय राखून काम करावे, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे आयोजित आढावा बैठकीत दिले. दरम्यान जिल्ह्यात महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी विशेष पॅकेज आणणार असून भूमिगत वीज वाहिन्यांचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात दाखल झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा बैठक आज श्री. राणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी त्यानी उपस्थितांना सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी स्वाती साठे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीश राऊत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिश दळवी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. राणे पुढे म्हणाले, पावसामुळे वीज संबंधित अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने या विभागाने अधिक सतर्क राहावे. कर्मचाऱ्यांनी अलर्ट राहून वीज पुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घ्यावी. भविष्यात महावितरणच्या दुरूस्ती कामांसाठी विशेष पॅकेज आणणार असून या पॅकेजमधून जिल्ह्यतील वीजेचा प्रश्न कायमचा सोडविण्यात येईल. तसेच डिसेंबर अखेर भूमिगत वीज जोडणीचे काम पूर्ण करण्यात येईल. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे ही कामे तात्काळ पूर्ण करावीत. संबंधित अधिकाऱ्यांनी दौरे करुन प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी नियमित भेटी देत कामांचा आढावा घ्यावा. कामाच्या दर्जेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. घाट क्षेत्रात दरडी कोसळल्यास संबंधित यंत्रणांनी तात्काळ त्याठिकाणी भेट कोसळलेली दरड बाजूला करुन घाट रस्ता सुरू करावा. संबंधित कंत्राटदारांनी त्या ठिकाणी मनुष्यबळ तैनात ठेवावे. ज्या ठिकाणी वारंवार दरडी कोसळतात अशा ठिकाणी कायमस्वरूपी उपाय योजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य यंत्रणेविषयी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, पावसाळा कालावधीत साथीच्या आजारांचे नियंत्रण करण्यासाठी नियोजन करावे, अस्वच्छतेमुळे कोणतेही आजार पसरणार नाहीत यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच कोविडच्या अनुषंगाने देखील नागरिकांनी काय काय खबरदारी घ्यावी याविषयी जन जागृती करावी. वन विभागाने यापुढे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कामे संपवावीत. रस्त्यांवर झाड पडल्यास ते झाड त्वरित बाजूला करण्याबाबत येाग्य ते नियोजन करावे. तेसच अशा रस्त्यांवरची धोकादायक झाडे, फांद्या बाजूला करण्यात याव्यात. संबंधित कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यात जिल्हाभरात फिरून परिस्थितीचा आढावा घेऊन उपाय योजना कराव्यात. एसटी विभागाने देखील पावसामुळे प्रवाशांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. नगर पालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे तात्काळ हाती घ्यावीत जेणेकरुन स्वच्छता राहिल. नगरी पालिका अखत्यारीतील रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. मान्सून कालावधीत नगरी पालिका क्षेत्र स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी. नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा करावा. जिल्ह्यातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी बैठक घेवून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या नियोजनाबाबत विचार विनिमय करावा असेही निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.