बिबट्यांच्या हल्यात वाढ; ग्रामस्थांमध्ये घबराट…
वैभववाडी ता.२६:
बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या फस्त केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी निमअरुळेत घडली. बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. या हल्ल्यात शेतकऱ्याचे सुमारे ८ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील निमअरुळे येथील प्रकाश कदम हे शेतकरी आपल्या शेळ्या चारण्यासाठी तेथील रिंगेसखल दंड येथे दुपारी घेऊन गेले असता दबा धरून राहिलेल्या बिबट्याने शेळी व सहा महिन्याच्या कोकरूवर बिबट्याने झडप घालून ठार मारले. महिन्याभरापूर्वीच कुर्ली येथील पोवार दाम्पत्यांवर बिबट्याने खुनी हल्ला केला होता. त्यानंतर वनविभागाने सापळा लावला होता. मात्र तो सापडला नाही. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनविभागाचे वनरक्षक पी. डी . पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शेतकऱ्याचे सुमारे ८ हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. यावेळी निमअरुळे पोलीस पाटील अंकुश आंगवलकर, अरुळे शिवसेना शाखा प्रमुख आप्पा सुतार, प्रथमेश कदम उपस्थित होते.