कुडाळ,ता.०५: मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर येथे पांडुरंग नारायण घाटवळ (वय ७०, रा.निवती) हे बस पकडण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना अचानक आडवे आल्याने कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसची त्यांना धडक बसली. बसच्या चाकाखाली सापडून त्याच्या पायांना तसेच डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु वाटेतच त्यांचे निधन झाले. ही घटना रविवारी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
कुडाळ आगाराची ही बस झाराप येथे सीएनजी भरण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. ही बस बसचालक नागेश एकनाथ पाटील (वय ३७, मूळ रा.राधानगरी – कोल्हापूर ) चालवीत होते. घाटवळ यांनी आज दुपारी पिंगुळी- वडगणेश मंदिर जवळच्या एका हॉटेलात जेवण केले. ते बसने बांदा येथे जाणार होते. बससाठी महामार्गाच्या पलीकडे बस थांब्याकडे जाण्यासाठी ते महामार्ग ओलांडत होते. त्याचवेळी त्यांना कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने जाणारी बस येत असल्याचे दिसले. महामार्ग ओलांडत असताना त्याच बसच्या समोर अचानक आडवे आले. बसची त्यांना धडक बसून ते बसच्या डाव्या बाजूकडील पुढील चाकाखाली सापडले. यात त्यांचा उजवा पाय फॅक्चर झाला, तर डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच डोक्यालाही जखम झाली. घटना घडताच वडगणेश मंदिर नजीकचे व्यावसायिक व ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. बसचालक श्री. पाटील यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमीला रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल केले. येथे जखमी घाटवळ यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु वाटेतच त्यांचे निधन झाले.
कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. अपघाताची फिर्याद नारायण पांडुरंग घाटवळ यांनी पोलिसात दिली.
पांडुरंग घाटवळ मासेमारी करायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे,मुलगी, सून, जावई,नातवंडे असा परिवार आहे.



