शितल राऊळ व अक्रम खान यांचा आरोप:बांदा-दोडामार्ग रस्त्यावरून “श्रेयवाद” रंगला….
बांदा ता.०९:
झाराप ते दोडामार्ग-आई पर्यंतच्या रस्त्यासाठी ५०० कोटी रुपयांची निविदा कालच सार्वजनिक बांधकाम विभागाने मागविली आहे. आद्यपपर्यंत कोणीही निविदा भरलेली नाही. बांदा गडगेवाडी येथे करण्यात येत असलेले रस्त्याचे काम हे एसआर (स्पेशल रिपेअर) मधून केवळ ३०० मीटर पर्यंत करण्यात येत आहे. या रस्त्यासाठी १३० कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंजूर केल्याचे शिवसेना पदाधिकारी सांगत आहेत, ते हास्यास्पद असून आपले अज्ञान यामधून प्रगट करत असल्याचा टोला पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ व सरपंच अक्रम खान यांनी लगावीला आहे. चुकीच्या माहितीचे आकडे देऊन लोकांची दिशाभूल करू नये, असा सल्लाही राऊळ यांनी यावेळी दिला.
राऊळ म्हणाले की, या रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खात्यांतर्गत निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात दोन वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. काल पुन्हा निविदा उघडण्यात आल्या आहेत. हा रस्ता हायब्रीड अंतर्गत सुसज्ज बनविण्यात येणार आहे.
सरपंच अक्रम खान यांनी उपोषण केले होते त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी एसआर मधून ३०० मीटरच्या डांबरीकरणाचे काम करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसारच हे काम करण्यात आल्याचे राऊळ यांनी सांगितले.
बांद्यातील सेना पदाधिकारी चुकीच्या महितीचे आकडे देत आहेत. १३० कोटी रुपये मंजूर करायला दीपक केसरकर हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नाही आहेत, हे पहिल्यांदा सेना पदाधिकाऱ्यांनी ध्यानात घ्यावे, असा सल्लाही राऊळ यांनी दिला.