नागेंद्र परब यांचा आरोप; सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसल्याने स्वैराचार माजलाय…
सिंधुदुर्गनगरी ता.२२: जिल्हा परिषदेचा कारभार सर्वसामान्य जनतेसाठी चाललाय की ठेकेदार व कार्यकर्ते यांच्यासाठी सुरु आहे ? हे समजत नाही. निवडून आलेल्या सदस्यांने कारभार चालवला असता तर ठीक होते. पण सध्या कारभार अँटी चेंबरमधून सुरु आहे. असा खळबळ जनक आरोप जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांनी पत्रकार परिषदेद्वारे शुक्रवारी केला.
ओरोस फाटा येथील खा. विनायक राऊत यांच्या कार्यालयात जिल्हा परिषदेच्या शिवसेना सदस्यांची बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, संजय पडते, हरी खोबरेकर, अमरसेन सावंत यांच्यासह बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. यावेळी परब यांनी, सत्ताधारी अकार्यक्षम असल्याने कृषि प्रदर्शन पुढे ढकलले जात आहे. यापूर्वी आ वैभव नाईक यांच्यावर खापर फोडले. आता अस्थिर राज्य सरकारवर खापर फोडण्यात येत आहे. हे प्रदर्शन होने गरजेचे आहे. उपाध्यक्ष रणजीत देसाई यांना मुख्यमंत्री यांना बोलवायचे आहे. तशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्री आणावे. पालकमंत्री यांना बोलवावे, असा टोलाही लगावला.
शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक निष्ठावंत आहेत. त्यामुळे ते गद्दारी करणार नाही. उपाध्यक्ष देसाई यांच्या संपर्कात यातील एकही नसुन साधा फोनही कोण करणार नाही. उपाध्यक्ष देसाई यांनी ज्या पक्षात गेले आहेत त्या भाजपच्या सदस्यांशी संपर्कात रहावे, असा सल्ला परब यांनी यावेळी दिला.