वैभववाडी.ता,२५: विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक समस्या व वाढत्या तापमानात शरिराला पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालयात वाॅटर बेल ही संकल्पना अमलात आणली आहे. या संकल्पनेचा शुभारंभ बुधवारी विद्यालयात पार पडला.
सध्याच्या धावपळीच्या काळात शालेय विद्यार्थी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहाताना दिसत नाहीत. परिणामी बऱ्याचवेळा विद्यार्थी आजारी पडत असतात. शालेय परीक्षांच्या काळात तर आजारी पडण्याच्या कारणामुळे हुशार होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. कमी मिळालेल्या गुणांमुळे त्यांची मानसिकता ढासळते. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्या आरोग्याकडे व समतोल आहाराकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच शरिरातील आवश्यक पाण्याचे प्रमाण, पाण्याच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या समस्या यांविषयी जेष्ठ शिक्षक एस. बी. शिंदे, एम. एस. चोरगे व पी. बी. पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्था अधिक्षक श्री जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक श्री बी. एस. नादकर, एस. टी. तुळसणकर, एस. एम. सुर्यवंशी, तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग आणि प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
चौकट- केरळमध्ये मुलांनी भरपूर पाणी प्यावे म्हणून पाणी पिण्यासाठी घंटा वाजवली जाते. या आशयाचा मेसेज गेले काही दिवस सोशल मीडियावर सर्वत्र फिरत होता. ही संकल्पना लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शाळांमध्ये ‘वॉटर बेल’ या संकल्पनेचा प्रारंभ करण्यात आला.