Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबांदा-शिरोडा मार्गावरील पाईपलाईन खोदाईचे काम ग्रामस्थांनी रोखले...

बांदा-शिरोडा मार्गावरील पाईपलाईन खोदाईचे काम ग्रामस्थांनी रोखले…

ग्रामपंचायत बैठकीत निर्णय; रस्ता सुरक्षेचे नियम डावलून काम सुरू असल्याचा आरोप…

बांदा.ता,२१: 
बांदा-शिरोडा मार्गावर सुरू असलेले पाईपलाईनच्या खोदाईचे धोकादायक काम शुक्रवारी ग्रामस्थांनी रोखले होते. शनिवारी झालेल्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या बैठकीत जोपर्यंत रस्ता सुरक्षिततेची लेखी हमी बांधकाम विभाग देत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर काम प्रशासनाचे नियम डावलून सुरू असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी यावेळी केला. बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित न राहिल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
मडुरा ग्रामपंचायत कार्यालयात पाईपलाईनच्या धोकादायक कामांबाबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मडुरा सरपंच साक्षी तोरसकर, उपसरपंच विजय वालावलकर, सदस्य माधुरी वालावलकर, स्वाती परब, राजन कामुलकर, शशीकांत परब, सखाराम परब, सानिका वेंगुर्लेकर, साक्षी परब, माजी उपसरपंच उल्हास परब, दिलीप परब, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू गावडे, नारायण परब, बाबल तुयेकर यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सासोली ते वेंगुर्ले पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पामुळे गावाला फायदा होणार असल्याने सहकार्य असल्याचे सरपंच साक्षी तोरसकर यांनी सांगितले. मात्र, एकाधिकारशाही पद्धतीने काम करण्याला विरोध असल्याचा एकमुखी सूर बैठकीमध्ये उमटला. पाईपलाईन खोदाईची हद्द बांधकाम विभागाने आखून दिल्याप्रमाणे काम होत नसल्याचा आरोप माधुरी वालावलकर यांनी केला. रस्त्याच्या डांबरीकरणापासून किमान पाच फुटांवर खोदाई अपेक्षित असताना डांबरीकरणाला लागूनच खोदाई सुरु आहे. पावसाळ्यात रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता असून पूर्ण रस्ताच धोकादायक बनला असल्याचे बाळू गावडे यांनी निदर्शनास आणून दिले.
बांधकाम विभाग साईडपट्टीची जोपर्यंत लेखी हमी ग्रामपंचायत प्रशासनास देत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नारायण परब यांनी खोदाईच्या कामावर निरीक्षण करण्यासाठी बांधकामचे अभियंता नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. बेजबाबदार ठेकेदारांना काम करण्यास प्रशासन कशी काय परवानगी देते असा सवालही उपस्थित केला.
यावेळी उल्हास परब, दिलीप परब, शशिकांत परब यांनी सवाल उपस्थित केले. शेवटी मंगळवार २४ डिसेंबर रोजी सकाळी बांधकाम विभाग, एमजीपी कंपनी अधिकारी व ग्रामस्थांची पुन्हा बैठक बोलावण्याचे ठरविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments