डी.के.सावंत;विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याबाबत चर्चा…
सावंतवाडी ता.२३: कोकण रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची होणारी मुस्कटदाबी व रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आलेल्या विविध मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेता,कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५::०० वा.मुंबई-दादर येथील सावंतवाडी संस्थान मराठा समाज हॉलमध्ये एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी कोकण रेल्वे संदर्भात विविध समस्यांबाबत चर्चा केली जाणार असून त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याबाबत चर्चा केली जाणार आहे,अशी माहिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी.के.सावंत यांनी आज येथे दिली.याबाबत त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी सतीश पाटणकर,नकुल पार्सेकर,विनोद रेडकर आदी उपस्थित होते.
श्री सावंत पुढे म्हणाले,२३ जुलैला विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री,खासदार,रायगड-रत्नागिरी चे आमदार व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना तसेच कोकण रेल्वे प्रशासन यांना पत्र दिले होते.मात्र केंद्रीय मंत्री श्री.प्रभु वगळता अन्य कोणीही या पत्रा बाबत दखल घेतली नाही.त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधींना लोकांच्या समस्यांची कुठलेच जाणीव नसल्याचे दिसून येत आहे.कोकण रेल्वे प्रशासनाचे व्यवस्थापन पूर्णपणे दिशा भूल करणारे आहे.पन्नास लाखाच्या वर अनेक चाकरमानी डहाणू,मुंबई,ठाणे या भागात राहतात.सण-उत्सव असले की त्यांना कोकण रेल्वेतून गावी यायचे असते,मात्र त्यांना कोकण रेल्वे प्रशासनाकडून कुठलीच योग्य अशी सुविधा मिळत नाही.कोकण रेल्वे प्रशासन म्हणजे एक लुटणारे महामंडळ आहे.दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या मागणी नसतानाही सुरू कशा आहेत.मात्र कोकण रेल्वे स्थानकावर गाड्या थांबत नाहीत,अशी परिस्थिती आहे.त्याचे स्पष्टीकरण हे रेल्वे प्रशासनाकडे नाही,असेही श्री.सावंत म्हणाले.
कोकण रेल्वे संदर्भात आधी कुठलीही दखल एखादा राजकीय पक्ष घेत नाही. कोकण रेल्वे प्रशासनाच्या भ्रष्टाचारी व ढिसाळ कारभार विरोधात आपण कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबई येथील सावंतवाडी मराठा संस्थान हॉलमध्ये शिवाजी मंदिर जवळ एलगार परिषद आयोजित केली असून या एल्गार परिषदेमध्ये जो काही निर्णय होईल त्याला कोकण रेल्वे प्रशासनाने तोंड द्यावे,प्रवासी संघटनेचा जो काही उद्रेक होईल,त्याला कोकण रेल्वे प्रशासनच जबाबदार असेल,असेही श्री.सावंत म्हणाले.संपूर्ण भारतात महिलांना आणि अपंगांना विशेष डबा नाही,अशी पहिलीच रेल्वे म्हणजे कोकण रेल्वे होय,कोकण रेल्वेचे संजय गुप्ता यांनी डोळेझाकच केली आहे.कोकण रेल्वे प्रशासनाची ऑडिट होणे आवश्यक आहे.आरटीआय मध्ये मागणी केली असता कोकण रेल्वे प्रशासनाची स्वतःची मालकीची अशी जागा नाही.सिडकोच्या जागेत शेकडो कोटी रुपये देऊन राहत आहेत.याचा ताण कोकण रेल्वे प्रवासावर येत आहे.शेकडो कोटीची भाडे करण्यापेक्षा स्वतःची जागा असावी,मात्र याची दखल घेणारा कोणीच नाही,असेही सावंत म्हणाले.