महेश सावंत; इन्सुली माध्यमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात…
बांदा.,ता२९:
सध्याचे युग हे यांत्रिकीकरणाचे आहे. जागतिक पातळीवर स्पर्धा वाढल्याने या स्पर्धेत कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा यासाठी ग्रामीण शिक्षण पद्धती ही बदलणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन टाटा ग्रुप कंपनीचे सरव्यवस्थापक महेश सावंत यांनी इन्सुलि येथे केले.
विद्या विकास संस्था संचलित इन्सुलि येथील नूतन माध्यमिक विद्यालयात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक शैलेश पै, आर. एन. पालव, संस्थेचे अध्यक्ष उमेश पेडणेकर, उपाध्यक्ष काका चराटकर, सचिव विकास केरकर, पंचायत समिती सदस्य मानसी धुरी, सरपंच पूजा पेडणेकर, अजय कोठावळे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय राणे, हरिश्चंद्र तारी, माऊली देवस्थान समितीचे अध्यक्ष कृष्णा सावंत, शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष रवींद्र परब, मुख्याध्यापक विनोद गावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी शाळेच्या वतीने श्री सावंत व श्री पै यांचा सत्कार करण्यात आला.
उमेश पेडणेकर म्हणाले की, इन्सुलि गावाच्या एकजुटीमुळे आज शाळेची भव्य इमारत उभी राहिली आहे. भविष्यात शाळेत विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, मैदानी खेळांचे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी जागतिक प्रवाहात टिकला पाहिजे.
यावेळी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा पालव यांनी केले. प्रास्ताविक विकास केरकर यांनी केले. आभार सचिन पालव यांनी मानले.