सुमारे ४५० वर्षाची परंपरा; वार्षिक उत्सव; सडुरेच्या जंगलात थाटला संसार
वैभववाडी/पंकज मोरे.ता,०४: सुमारे ४५० वर्षाची परंपरा जपणा-या शिराळे गावच्या गावपळणीला शनिवारपासून सुरूवात झाली. गावपळणी दरम्यान शिराळेवासिय पाळीव प्राणी पशुपक्ष्यांसह आणि लागणारा धान्याचा साठा घेऊन नजिकच्या सडुरे गावच्या हद्दीत दडोबा डोंगराच्या पायथ्याशी चिमुरड्यांसह वयोवृध्दही सहभागी झाले आहेत.
वैभववाडी तालुक्यातील शिराळे गाव वैभववाडी शहरापासून सुमारे १५. कि. मी. अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे. या गावातील जागृत देवस्थान असलेल्या श्री. गांगेश्वर देवाच्या हुकुमाने ही गावपळण होते. गावपळण दरवर्षी पौष महिन्यात कडाक्याच्या थंडीमध्ये होते. ही गावपळण म्हणजे गांगो देवाचे वार्षिक समजतात. पौष महिन्यामध्ये होत असलेली ही गावपळण पाच, तीन किंवा सात दिवसांची असते. तीन दिवस झाल्यानंतर गांगोला कौल लावून देवाने हुकूम दिल्यानंतर शिराळेवासिय गावात परततात.
यावेळी शनिवारपासून गावपळणीला सुरूवात झाली आहे. शिराळेवासिय गावपळणी दरम्यान लागणारा धान्य साठा, जनावरे, पक्षी या सर्व गोष्टी घेऊन गावाबाहेर जातात. व सडुरे गावच्या हद्दीमध्ये म्हणजे दडोबाच्या पायथ्याशी मोकळ्या माळरानावर झोपड्या बांधून वास्तव्य करतात. गावपळणीच्या अगोदर एक दिवस आधी घरामध्ये गोड जेवण किंवा मांसाहारी जेवण करुन बाहेर पडतात. शिराळेवासिय शनिवारी सकाळी घरामध्ये जेवण करुन दुपारनंतर घरातून बाहेर पडतात. ज्या दिवशी घरातून बाहेर पडतात. तो दिवस गृहीत धरला जात नाही. कारण घरातील चुलीमध्ये अग्नी(विस्तव)असतो. या गावपळणीमध्ये घरातील चिमुकल्यांसह वयोवृध्द सहभागी होतात.
गावपळणी दरम्यान मुलांची प्राथमिक शाळा झाडाखाली भरविली जाते. गावात गावपळणी दरम्यान एस. टी. बस सुध्दा जात नाही. गावपळणीला शिराळेवासिय गावाबाहेर निघाले की, जनावरे, पक्षी घेवून बाहेर पडतात. दिवसा ही जनावरे सडुरे हद्दीत सोडून दिलेली असतात. पण ती कधीही गावात पळून जात नाहीत. तर संध्याकाळी झोपडी ठिकाणी येतात. गावपळणी दरम्यान लगत असणाऱ्या सुख नदीमध्ये झरा खोदून पाण्याचा वापर करतात. ३० ते ३५ झोपड्या असून एकमेकांच्या झोपडीला झोपड्या लागून बांधलेल्या असतात. त्यामुळे दिवसरात्र हे सर्व लोक एकत्र राहतात. व गावपळणी दरम्यान खेळी मेळीच्या वातावरणात राहून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद लुटत असतात.
गांगो देवाने हुकूम दिल्यानंतर दोन दिवसात गावपळण केली जाते. गावपळण केल्यानंतर पहिले तीन दिवस कुणीही गावात पाऊल ठेवत नाहीत. कारण या तीन दिवसांच्या कालावधीत गांगेश्वर देवाबरोबर इतर देवतांची सभा भरते. असा ग्रामस्थांचा समज आहे. त्यामुळे तीन दिवस गावात कोणाचाही आवाज होता कामा नये, त्यामुळे पहिले तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर दिवसा ग्रामस्थ गावात जाऊन आपले घरदार पाहून येतात. पण गावात राहत नाहीत. तीन दिवसानंतर परत गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो. त्यानंतर गावभरणी होते. जोपर्यंत गांगोचा हुकूम होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ गावाच्या बाहेर राहतात.
त्यामुळे तीन, पाच, सात दिवसांची ही गावपळण असते. दरवर्षी गावपळण होणारी जिल्ह्यात एकमेव शिराळे गाव आहे. गावभरणी केल्यानंतर काही दिवसात गावातील एका माळरानावर जत्रौस्तव केला जातो. या जत्रौस्तवामध्ये तालुक्यातील इतर गावातील लोक, पाहुणे, चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. शिराळेवासियांचा आपल्या श्री. देव गांगेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. देवाचा हुकूम घेऊन ग्रामस्थ गाव सोडतात. परत तीन दिवसानंतर हुकूम घेऊन गावात परततात. शिराळे गाव सडुरे गावचा महसुली गाव असून सडुरे शिराळे गावात ८० कुटुंब असून सुमारे ३५० लोकसंख्या असणारा गाव आहे.