Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedपत्रकारांनी पत्रकारितेतून देशनिर्मितीचे महान कार्य करावे...

पत्रकारांनी पत्रकारितेतून देशनिर्मितीचे महान कार्य करावे…

रमाकांत  खलप ; जिल्हा, तालुका पत्रकार दिन, पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात…

मालवण, ता. ०६ : आपल्या लेखणीच्या माध्यमातून पत्रकार जनतेचे प्रश्न मांडत असतात. वृत्तपत्र हा समाजाचा आरसा असतो. समाजातील, देशातील समस्या पत्रकारांनी जनतेसमोर मांडून लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करायला हवा. पत्रकारांनी आपल्या पत्रकारितेतून देशनिर्मितीचे महान कार्य करावे असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी येथे केले.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ व मालवण तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिन व पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालयात झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. खलप यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, सभापती अजिंक्य पाताडे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सरपंच प्रतिमा भोजने, ज्येष्ठ पत्रकार वसंत केसरकर, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, देवयानी वरसकर, उमेश तोरसकर, निलेश तेंडोलकर, संतोष सावंत, हरिश्चंद्र पवार, एकनाथ पवार, उज्वल नारकर, सीए नाईक, संतोष वायंगणकर, बाळ खडपकर, रमेश जोगळे, बंटी केनवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. भाजप नेते अशोक सावंत, शिवसेना नेते भाई गोवेकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, नितीन वाळके, तृप्ती मयेकर, नागेंद्र परब, बबन शिंदे, भाऊ सामंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पत्रकार संघाचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळ्याची सुरुवात कोळंब कातवड प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी इशस्तवन गीताने केली. अध्यक्ष प्रफुल्ल देसाई यांनी मान्यवरांचे स्वागत केले. पत्रकारांना पुरस्कारातून प्रोत्साहन मिळते. मालवणच्या जडणघडणीत पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पत्रकार संघाच्या वाटचालीचा उमेश तोरसकर यांनी आढावा घेतला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गजानन नाईक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समर्थ सभागृहाचे मालक प्रवीण सावंत, लक्ष्मण नाईक, महेश सरनाईक यांना महाराष्ट्र लोकरत्न सेवा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दलही विशेष सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौगंधराज बादेकर तर आभार प्रशांत हिंदळेकर यांनी मानले.
खासदार राऊत म्हणाले, मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे कर्तृत्व अभिमानास्पद आहे. ‘दर्पण’कारांच्या पत्रकारितेची जगात आदर्शनीय ओळख आहे. ती परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी कायम राखली आहे. बातम्यांच्या माध्यमातून सामाजिक समस्या दूर करण्यासाठी संसदेत प्रयत्न करतो. केंद्र सरकारने पारित केलेला पत्रकार संरक्षण कायदा हे पत्रकार चळवळीचे यश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडणाऱ्या सर्व घटना पत्रकार लोकांपर्यंत पोचवतात. त्यातून अनेक प्रश्न मार्गी लावले गेले आहेत. लोकप्रतिनिधी आणि पत्रकार विकासातील महत्वाचे दुवा आहेत. मालवणला उत्कृष्ट पत्रकारितेचा वारसा असल्याने पत्रकारांच्या साथीने अनेक प्रश्न सोडवू शकलो, असे आमदार नाईक यांनी सांगितले.
श्री. कांदळगावकर म्हणाले, इतिहास घडविणे व बदलण्याचे सामर्थ्य पत्रकारांमध्ये आहे. शाश्वत विकासात पत्रकाराचे स्थान महत्वाचे आहे. अजिंक्य पाताडे म्हणाले, मालवणच्या पत्रकारांची टीम कौतुकास्पद आहे. पत्रकाराचे महत्व लोकशाहीत मोलाचे आहे. पत्रकारितेला मोठा वारसा लाभला आहे. सत्याला वाचा फोडण्याचे पत्रकार करत असलेले काम हे जणू समाजसेवेचे व्रत आहे, असे प्रतिमा भोजने यांनी सांगितले. पत्रकारितेत आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. जांभेकरांच्या जिल्ह्यात पत्रकारिता करणे हा आपला सर्वांचा भाग्याचा क्षण आहे. आमचा पत्रकार कोणाच्या खिशात हात घालत नाहीत असे गणेश जेठे म्हणाले. आमचे सर्व पत्रकार सधन आहेत. आमच्यात एकजूट असल्याने पत्रकार सहायता निधीसाठी ओरोस व देवगड पत्रकार संघाने प्रत्येकी दहा हजाराची रक्कम जिल्हा पत्रकार संघाकडे सुपूर्द केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार मनोज चव्हाण, आदर्श पत्रकार किशोर जैतापकर, ज्येष्ठ पत्रकार वसंत केसरकर, आदर्श ग्रामीण पत्रकार संजय सावंत, उत्कृष्ट छायाचित्रकार वैभव केळकर, मालवण तालुका पत्रकार समितीचा उत्कृष्ट पत्रकार विद्याधर केनवडेकर, ग्रामीण पत्रकार पुरस्कार संतोष हिवाळेकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सन्मानपत्रांचे वाचन अमित खोत यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना केनवडेकर म्हणाले, पत्रकारिता करत असताना मला अनेक धमक्या आल्या. मात्र माझ्या प्रामाणिक पत्रकारितेमुळे कोणासमोर झुकलो नाही. हा पुरस्कार माझे गुरू नरेंद्र परब यांच्या कार्याचा गौरव आहे. मालवणच्या मातृभूमीला गुरुजनांना माझा पुरस्कार अर्पण करतो, असे मनोज चव्हाण यांनी सांगितले. किशोर जैतापकर यांनी सर्वसामान्य पत्रकाराचा गौरव झाला, असे सांगितले. संजय सावंत यांनी माझ्या पुरस्काराचे श्रेय मार्गदर्शकाना देतो, असे सांगितले. वैभव केळकर म्हणाले, हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. चुकीच्या गोष्टींवर आसूड ओढण्यासाठी टोपण नावाने पत्रकारिता केली. एका हातात लेखणी दुसऱ्या हातात संघर्ष असे जीवन जगलो, असे वसंत केसरकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments